चेतन वाघमारे
कामशेत – इंद्रायणी नदी देहू आणि आळंदी या तिर्थक्षेत्रातून वाहते. यामुळे या नदीला पवित्र मानले जाते. लोणावळ्याहून उगम पावणाऱ्या या पवित्र नदीत कामशेतसह ठिकठिकाणी कोणतीही प्रक्रिया न करता सांडपाणी सोडले जात आहे. याच इंद्रायणी नदीतून तळेगाव, देहूला पाणी पुरवठा होत असून लवकरच पिंपरी चिंचवडलाही पाणी पुरवठा होणार आहे.
मावळ तालुक्यातून पवना आणि इंद्रायणी या दोन प्रमुख नद्या वाहतात. नदीकाठी अनेक गावे व छोटी शहरे आहेत. यापैकी बहूतांश शहरांमध्ये भूयारी गटर योजना आहे. या योजनेतून सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता ओढा किंवा नाल्यात सोडले जाते. हे ओढे-नाले थेट नदीला जाऊन मिळतात. यामुळे मावळ तालुक्यातील या दोन्ही नद्या प्रदुषित झाल्या आहेत.
कामशेत शहराची लोकसंख्या दहा हजारांच्या वर आहे. शहरात भूयारी गटर योजना आहे. मात्र सांडपाण्यावर प्रक्रिया करणारा एकही प्रकल्प नाही. त्यामुळे वर्षाचे बाराही महिने येथील सांडपाणी थेट इंद्रायणी नदीत जाऊन मिळते. कामशेतच्या अगोदरच्या भागातूनच नदीपात्रात शेवाळ व जलपर्णी आढळून येते. त्यामुळे लोणावळापासूनच नदी प्रदुषणाला सुरवात होत असणार हे नक्की.
एकेकाळी खळखळून वाहणाऱ्या इंद्रायणीचा श्वास आता या जलपर्णींखाली गुदमरतोय. इंद्रायणी नदीची अक्षरशः गटारगंगा झाली आहे. इंद्रायणी नदी प्रदुषणाबाबत वारंवार ताकीद देऊनही नदीच्या पात्रात रसायन आणि सांडपाणी सोडले जात आहे. याकडे ग्रामपंचायत व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे.लोणावळा येथून उगम पावणारी नदी कामशेत मार्ग देहू आळंदी येथे वाहते. कोट्यावधी जनतेचे श्रद्धास्थान असलेल्या देहू-आळंदीच्या विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे.
येथे येणाऱ्या वारकऱ्यांना शुद्ध पाणी देण्याची गरज आहे. मात्र इंद्रायणी नदीची अवस्था पाहवत नाही. वारंवार इंद्रायणी नदी फेसाळलेली दिसत आहे. नदीतील मासे मृत्यूमुखी पडत आहेत. देहू-आळंदी ही प्रमुख तीर्थक्षेत्र आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दररोज हजारो भाविक ज्ञानोबा-तुकारामांच्या दर्शनासाठी येत असतात. इंद्रायणी ही पवित्र नदी म्हणून ओळखली जात असल्याने त्यात काही भाविक स्नानही करतात. दुषित पाण्यामुळे भाविकांना त्वचारोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
“सध्या सहा ठिकाणीचे ओढे-नाले इंद्रायणी नदीला जाऊन मिळतात. कामशेतमध्ये सध्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी कोणताही प्रकल्प नाही. त्यामुळे सांडपाणी थेट नदीपात्रात जात आहे. मात्र राज्य आणि केंद्र शासनाकडे या प्रकल्पांसाठी प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे. लवकरच हा प्रकल्प मंजूर होण्याची शक्यता आहे, ” असे कामशेतचे सरपंच रूपेश गायकवाड म्हणाले.
सोमवारी (दि. 8) देहू देवस्थान संस्थानमध्ये पालखी सोहळ्याच्या तयारीसाठी उपजिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली. या बैठकीमध्ये इंद्रायणी नदीपात्रात लोणावळ्यापासून ठिकठिकाणी सांडपाणी सोडत असल्याचे पाटबंधारे विभागाने उपजिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.