शिर्डी – गावकरी गेटने फक्त शिर्डीच्याच रहिवासी असलेल्या नागरिकालाच ओळखपत्राच्या आधारावर प्रवेश देऊन ग्रामस्थांची रजिस्टरमध्ये नोंद करण्यात येईल. साई संस्थानच्या या निर्णयाचे देशभरातील भाविकांनी स्वागत केले असून, शिर्डीकरांचा साईसमाधी दर्शनाचा प्रश्न सुटल्याने ग्रामस्थांनीही समाधान व्यक्त केले. मात्र, त्यांच्या सोबत असलेले मित्र आणि इतरांना मात्र दर्शनपास शिवाय प्रवेश दिला जाणार नाही.
शिर्डी ग्रामस्थ व साई संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांच्यासोबत मागील आठवड्यात बैठक झाली होती. यामध्ये मुख्य चार मागण्या होत्या, तर गेट नं. 3 या ठिकाणी ग्रामस्थांना दररोज दर्शनासाठी जाण्याची व्यवस्था होती. मात्र, त्या ठिकाणी ग्रामस्थांच्या नावाखाली इतरही अनोळखी लोक फुकटच्या दर्शनाचा लाभ घेत होते, तर त्या माध्यमातून अनेक एजंट व सुरक्षारक्षक बेकायदा पैसे कमवत होते.
ही गंभीर बाब ग्रामस्थांनी जाधव यांच्या लक्षात आणून दिली. त्यांनीही याबाबत सविस्तर माहिती घेऊन लगेचच निर्णय घेतला की, गावकरी गेटने शिर्डीच्याच रहिवासी असलेल्या नागरिकाला ओळखपत्राच्या आधारावर प्रवेश देऊन ओळखपत्राची रीतसर तपासणी करून ग्रामस्थांची रजिस्टरमध्ये नोंद करण्यात येईल, तसेच त्यांच्या सोबत असलेल्यांना दर्शनपास शिवाय प्रवेश दिला जाणार नाही. अशा प्रकारच्या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाल्यावर गेट नं. 3वर सुरू असलेल्या दर्शनाच्या काळाबाजारावर चाप बसला, तर झटपट दर्शन घडवून आणणाऱ्या एजंटाच्या टोळ्या गायब झाल्या.
गावकरी गेटने एका आधारकार्डच्या आधारावर अनेक अनोळखी लोक एजंट व सुरक्षारक्षक यांच्याशी सेटिंग करून प्रवेश मिळवत होते. मात्र, यातून कमी वेळेत, कमी कष्टात खूप पैसा मिळतो, म्हणून अनेक गुन्हेगारी टोळ्यांची नजर पडली होती आणि त्यातून गैरप्रकार सुरू झाले होते. कधी नव्हे ते गुरुवारच्या पालखीत भाविकांना शांततेत दर्शन मिळाले, तर मानकरी व साई संस्थानचे चोपदार, पुजारी यांच्यासमवेत गुरुवारची पालखी शांततेत पार पडल्याने समाधानाचे वातावरण बघावयास मिळाले.
एजंटांच्या टोळ्या गायब!
गावकरी गेटने एका आधारकार्डच्या आधारावर अनेक अनोळखी लोक एजंट व सुरक्षारक्षक यांच्याशी सेटिंग करून प्रवेश मिळवत होते. परंतु साई संस्थानच्या या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाल्यावर गेट नं. 3वर सुरू असलेल्या दर्शनाचा काळाबाजार यावर चाप बसला, तर झटपट दर्शन घडवून आणणाऱ्या एजंटाच्या टोळ्या गायब झाल्या.
देणगीच्या प्रमाणात वाढ!
शिर्डीतील युवा ग्रामस्थ व छत्रपती शासन या संघटनेतील तरुणांना ही बाब खटकत होती, म्हणून त्यांनी गेट नं. 3वरील एजंटला शोधून चांगलाच चोप दिला होता. या कारवाईचा अनेक एजंटांनी धसका घेतला असून, एका आधार कार्डवर एकच ग्रामस्थ जाऊ शकतो यामुळे काहीजणांना हा निर्णय जड गेल्याचेही बोलले जात असले, तरी या निर्णयामुळे बाबांच्या दानपेटीत देणगीचे प्रमाण वाढले हे विशेष यश म्हणावं लागेल.
“शिर्डीच्या मूळ रहिवासी असलेल्या मुला-मुलींना कामानिमित्त बाहेरगावी राहावे लागते. अशा माहेरच्या लेकींना गावकरी गेटने प्रवेश देण्यात यावा व कोणत्याही ग्रामस्थांची दर्शनासाठी कुचंबणा होऊ नये यासाठी साई संस्थान प्रशासनाने काळजी घ्यावी,” असे राष्ट्रवादी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष संदीप सोनवणे म्हणाले.