हिंजवडी – हिंजवडीच्या लक्ष्मी चौक मुकाईनगर मार्गे गावठाणातून मुळा नदीला मिळणाऱ्या ओढ्याची अवस्था गटारगंगेप्रमाणे झाली आहे. कोट्यवधी रुपयांची उलाढाल असलेल्या हिंजवडी व मारुंजी या दोन्ही ग्रामपंचायतीनी थेट मैलामिश्रित पाणी ओढ्याला उघड्यावर सोडल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
दुर्गंधीयुक्त सांडपाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. डेंगू, मलेरिया सारख्या साथीच्या आजारांचा फैलाव वाढला आहे. या रोगराईमुळे हिंजवडीतील अनेकजण थंडी, ताप, खोकला, सर्दी आशा आजारांनी ग्रासले असून, अनेकांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. थेट ओढ्यात सोडलेल्या या दुर्गंधीयुक्त सांडपाण्याचा ग्रामपंचायतीने तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी येथील स्थानिक रहिवाशांनी केली आहे.
हिंजवडी ग्रामपंचायत दरवर्षी गावातील गटार वाहिनीवर कोट्यवधी रुपये खर्च करते. तरीही गेल्या पंधरा वर्षात ग्रामपंचायतीला स्वतःचा मैला शुद्धीकरण प्रकल्प उभारता आला नाही. त्यामुळे पर्यायाने कुठलीही प्रक्रिया न करता थेट सांडपाणी गटारवाहिणीतून मुळा नदीत सोडले जाते. त्यामुळे मुळा नदी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाली असून या नदीवर असलेल्या पाणी योजना धोक्यात आल्या आहेत.
हिंजवडी, मारुंजी ग्रामपंचायतीने ओढ्यात सोडलेल्या सांडपाण्यामुळे येथील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. लाखो रुपयांचा कर भरूनही ग्रामपंचायतीकडून मूलभूत सुविधा मिळत नसल्याने नागरिक हैराण झाले आहेत. ग्रामपंचायतीने तातडीने दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्याचा बंदोबस्त केला पाहिजे.
– चंद्रकांत जांभुळकर, युवा उद्योजक.
हिंजवडी ग्रामपंचायतीने ओढ्यातील गटारलाइनची दुरुस्तीसाठी ठेकेदाराला सूचना दिल्या आहेत. परंतु पावसामुळे पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने तसेच त्या ठिकाणी जेसीबी सारखे यंत्र जात नसल्याने काम रखडले आहे. उघड्यावर सोडलेले पाणी बंदिस्त लाइनमध्ये सोडण्यास आठवडाभराचा कालावधी जाईल. त्यामुळे पुढील आठवडाभरात हे काम पूर्ण केले जाईल.
– प्रदीप वाघमारे, सरपंच, हिंजवडी ग्रामपंचायत.