सातारा (प्रतिनिधी) – ग्वाल्हेर बेंगलोर महामार्गावर म्हसवे व लिंब गावाच्या हद्दीवर डी मार्टसमोर खाजगी लक्झरी बस व ट्रक यांचा भीषण अपघात होऊन सहा जण जागीच ठार झाले. तर वीस जण गंभीर जखमी झाले. ही घटना पहाटे साडेपाचच्या दरम्यान झाल्याचे सांगण्यात येत आहे.
कर्नाटककडे जाणाऱ्या एसआरएस ट्रॅव्हल्स भरधाव वेगाने ट्रकच्या मागील बाजूस धडकल्याने हा भीषण अपघात घडल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले . जखमींना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले असून काही जणांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. ग्वाल्हेर बेंगलोर आशियाई महामार्ग क्रमांक 47 ची अवस्था पावसाने अतिशय खराब झाली आहे. विशेषतः आनेवाडी टोलनाका ते काशीळ या रस्त्यावर मोठमोठे खड़डे पडल्याने गंभीर अपघाताचा धोका वाढला होता. पुण्यावरुन कर्नाटककडे जाणारी एसआरएस ट्रॅव्हल्सची खाजगी बस पहाटे लिंब खिंड ओलांडून कऱ्हाडच्या दिशेने जात होती. ट्रॅव्हल्सचा वेग जास्त होता त्यामुळे पुढे असणाऱ्या ट्रकचा अंदाज न आल्याने ट्रॅव्हल्स मागील बाजूने जोरदार धडकली. ही धडक इतकी जबरदस्त होती की चालकाच्या केबिनसह मागील दोन तीन आसनाचा भाग क्षतीग्रस्त झाला. मृत झालेल्या सहा जणांमध्ये चालकाचा समावेश आहे. वीस प्रवाशी गंभीर जखमी झाले होते. अपघाताचे वृत्त कळताच सातारा तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक एस.व्ही.हंकारे, पोलीस निरीक्षक मांजरे, कर्मचारी पथक रुग्णवाहिकेसह यंत्रणा घटनास्थळी हजर झाली.