शेवगाव – तालुक्यातील भातकुडगाव मंडळासह 23 गावात दि. 7 ते 9 एप्रिल दरम्यान झालेल्या गारपीट व अवकाळीमुळे 4 हजार 808 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्याबरोबर वादळी वाऱ्यामुळे दोन गोठ्यांसह 30 कच्च्या घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. या अवकाळीचा फटका 7 हजार 397 शेतकऱ्यांना बसला असून ते सध्या नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहे. 8 कोटी 33 लाख 77 हजार रुपये आवश्यक निधीची मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
गारपीट व अवकाळी पावसामुळे 4 हजार 808 हेक्टर क्षेत्रातील गहू, हरबरा, उन्हाळी बाजरी, मका, सोयाबीन, भुईमूग, मूग, कांदा, वांगे, मिरची, टोमॅटो, कोबी, दोडका, वटाणा, बटाटा आदि भाजीपाला खरबूज, टरबूज आदि फळ पिके, घास, कडवळ, मका या चारा पिके झेंडू, शेवंती फूल पिकाचे नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे घराला लागून असलेल्या दोन गोठयांचे, 30 कच्या घरांचे अंशतः नुकसान झाले.
गहू 1 हजार 301 हेक्टर, मका 12 हेक्टर, हरबरा 5 हेक्टर, कांदा 3 हजार 352 हेक्टर, उन्हाळी बाजरी 136 हेक्टर क्षेत्राचा समावेश असल्याचा अहवाल जिल्हास्तरावर सादर करण्यात आला आहे. या संदर्भात आमदार मोनिकाताई राजळे सातत्याने लक्ष घातले तर माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी देखील मागणी उचलून धरली आहे.
तालुक्यात भातकुडगाव, बक्तरपूर, देवटाकळी भायगाव, शहरटाकळी, ढोरसडे, मजलेशहर, अत्रे, जोहरापूर, खामगाव, हिंगनगाव, भावीनिमगाव, सुल्तानपुर बू, ढोरजळगाव, आखतवाडे, मळेगाव, सामनगाव, ढोरजळगाव शे, आव्हाने, आपेगाव, गरडवाडी, वाघोली, निंबे आदि 23 गावात दि. 7 ते 9 एप्रिलच्या दरम्यान झालेल्या गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतकऱ्याच्या नुकसानीचे पंचनामे तालुक्यातील महसूल, कृषि व पंचायत समितीच्या कामगार तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहायकांकडून करण्यात येऊन जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आले आहे. त्यानुसार तालुक्यासाठी 8 कोटी 33 लाख 77 हजार रुपये आवश्यक निधीची मागणी करण्यात आल्याची माहिती तहसिलदार वाघ, गटविकास अधिकारी महेश डोके यांनी दिली आहे.