नागपूर – ठाकरे गटाचे नेते आमदार नितीन देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पिण्याच्या पाण्यासाठी जल संघर्ष यात्रा काढण्यात आली होती. बाळापूर व अकोला तालुक्यातील खारपाणपट्यातील 69 गावांच्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेला सरकारने स्थगिती दिली आहे. त्याविरोधात ही यात्रा काढण्यात आली होती.
उपमुख्यमंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानासमोर जाऊन हे आंदोलन करणार होते. मात्र त्याआधी नितीन देशमुख यांना अडवून ताब्यात घेतले. पोलिस आता देशमुखांना घेऊन अकोल्याच्या दिशेनं रवाना झाले आहेत. या संघर्ष यात्रेला नागपूरच्या सीमेवर धामना येथे अडवण्यात आले होते. याच बाबतीत आज सामनाच्या अग्रलेखातून शिंदे फडणवीस सरकार टीका केली आहे.
काय आहे सामनाचा अग्रलेख
आमदार नितीन देशमुखांनी अकोल्याच्या पाणीप्रश्नावर विधान भवनाच्या आवारात उपोषण केले. 69 खेड्यांसाठी तेल्हारा तालुक्यातील वान प्रकल्पातून 3.35 दलघमी पाणी आरक्षित करण्याचा निर्णय झाला होता, पण 3 मार्चला देवेंद्र महोदयांनी हे पाण्याचे आरक्षण रद्द केले. हा सरळ सरळ अन्याय आहे.
विरोधी बाकांवरील आमदारांच्या मतदारसंघात लोकांना पाणीही मिळू द्यायचे नाही हा विचार अमानुष आहे आणि पाणी मागण्यासाठी निघालेल्या आमदारांना अटक करणे म्हणजे डरपोक हुकूमशहाची दंडुकेशाही आहे. अशा राज्यकर्त्यांच्या घशात तेच खारे पाणी ओतायला हवे. नितीन देशमुखांचे तेच पाऊल होते. त्यांना अटक झाली, पण पाण्यासाठी संघर्ष सुरूच राहील!
भारतीय जनता पक्ष व त्यांचे पुढारी एक नंबरचे नौटंकीबाज लोक आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःचा एक फोटो स्वतःच प्रसिद्ध केला. टेबलावर फायलींचा ढिगारा असून ‘मिशन नो पेंडन्सी’च्या नावाखाली देवेंद्र महोदय फायली क्लीअर करताना त्या छायाचित्रात दिसत आहेत. वास्तविक कामाचा डोंगर मंत्रालयात साचला आहे आणि देवेंद्र त्या डोंगरावर आक्रमण करीत आहेत हे खरेच आहे, पण त्या फायली नक्की कोणाच्या आहेत? असा प्रश्न ठाकरे गटाकडून उपस्थित करण्यात आला आहे.
रोजगार, पाणी, शेतकरी यांच्याबाबत त्या फायली आहेत काय? तिकडे अकोल्यातील पाणीप्रश्न पेटला आहे व त्या प्रश्नाची सोडवणूक करणारी फाईल देवेंद्र महोदय क्लीअर करायला तयार नाहीत. अकोल्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार नितीन देशमुख हे या पाणीप्रश्नावर शेकडो लोकांसह पायी निघाले.
त्यांना देवेंद्र फडणवीस यांना अकोल्यातील क्षारयुक्त, प्रदूषित, विषारी पाण्याचा नमुना दाखवायचा होता. लहान बाळापासून वृद्धांपर्यंत सगळय़ांनाच हे विषारी पाणी प्यावे लागते. शुद्ध पाणी हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे, पण अकोल्यातील जनतेला विषारी पाणी प्यावे लागते. त्याच विषारी पाण्याचे नमुने राज्यकर्त्यांच्या समोर ठेवायला लोकप्रतिनिधी जात असतील तर तो अपराध ठरतो काय? पण गुरुवारी पहाटे देशमुखांना अटक केली गेली, त्यांना नागपुरात प्रवेश करण्यापासून रोखले गेले. ही दडपशाही आहे. ठाकरे सरकारच्या काळात अकोल्यातील पाणीप्रश्नावर तोडगा काढण्यात आला होता. मात्र अकोल्यासाठी मंजूर केलेली जलवाहिनी योजना मिंधे-फडणवीस सरकारने स्थगित केली. एकूण 69 गावांचा हा गंभीर पाणीप्रश्न आहे. या प्रश्नासाठी देशमुखांनी 10 एप्रिलपासून अकोल्यातून सुरू केलेली
पदयात्रा नागपूरच्या वेशीवर
पोहोचली व अपेक्षेप्रमाणे फडणवीसांच्या डरपोक सरकारने पळ काढला. फडणवीस हे अकोल्याचे पालकमंत्री आहेत व अकोल्याची जनता एक-एक घोट पाण्यासाठी तडफडत आहे. खारे पाणी, जे विषारी आहे ते पिऊन दिवस ढकलत आहे. या पाण्यामुळे अनेक जण रोगाने बेजार झाले आहेत, पण पालकमंत्री फडणवीस टेबलावर फायलीचा डोंगर निर्माण करून सहय़ा करतानाचे स्वतःचे फोटो काढून घेत आहेत. अहो देवेंद्र महाशय, बाकीचे सोडा, पण त्या फायलींच्या ढिगाऱ्यात अकोला पाणीप्रश्नाची फाईल आहे काय? तेवढे काय ते बोला. नितीन देशमुख हे एक झुंजार आमदार आहेत.
लोकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करणारे लोकप्रतिनिधी आहेत. ‘मिंधे’ गटाने त्यांनाही गुवाहाटीला धरून नेले होते, पण मोठय़ा शिताफीने ते स्वतःची सुटका करून घेऊन परत आले. खऱ्या शिवसेनेवरील त्यांच्या निष्ठा अविचल आहेत व त्यांनी मतदारांशी व मूळ पक्षाशी बेइमानी केली नाही. याची शिक्षा मिंधे-फडणवीस अकोल्याच्या जनतेला देत आहेत काय? पाण्यासाठी ‘संघर्ष यात्रा’ सुरू करताना देशमुख काय म्हणाले होते? ते म्हणतात, ‘‘अकोला-अमरावतीच्या खारपट्टय़ातील तीन महिन्यांचं बाळ जे पाणी पितं तेच पाणी देवेंद्र फडणवीस यांना आम्ही प्यायला देणार आहोत, तेच पाणी त्यांना आंघोळीसाठी देणार आहोत.
तेव्हा त्यांना आमची समस्या लक्षात येईल.’’ देशमुखांनी जे सांगितले त्यात चुकीचे काय? 21 एप्रिलला देशमुखांची ‘जल संघर्ष यात्रा’ नागपुरात पोहोचणार होती व फडणवीसांच्या घराबाहेर धडक देणार होती, पण त्याआधीच देशमुखांना जेरबंद केले. हा डरपोकपणा आहे. मिंधे गटात गेलेल्या बेइमान आमदारांना शेकडो कोटींचा निधी दिला जात आहे. हा निधी ठेकेदारांच्या घशात घालून कमिशन घेतले जात आहे. निधी व योजना फक्त कागदावरच आहेत. कमिशनबाजीतच हा निधी वापरला जातोय, पण अकोला-अमरावतीच्या जनतेला विषारी पाणी प्यावे लागतेय. खारघरला श्री सेवकांना पाण्याअभावी तडफडून मरावे लागले. ही महाराष्ट्राची खरी स्थिती आहे.
महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात पाणी खात्याचे जे ‘गुलाबी’ मंत्री आहेत, त्यांनीच पाण्याच्या नावावर पाण्यासारखा पैसा ओरपला आहे. ग्रामीण पाणीपुरवठा योजना, जल जीवन मिशन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या सगळय़ात मोठा भ्रष्टाचार उघडपणे सुरू आहे. त्या भ्रष्टाचाराची फाईल देवेंद्र महोदयांच्या टेबलावरील डोंगरात आहे काय? अकोल्यातील 64 गावांत दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. आमदार नितीन देशमुखांनी अकोल्याच्या पाणीप्रश्नावर विधान भवनाच्या आवारात उपोषण केले. 69 खेडय़ांसाठी तेल्हारा तालुक्यातील वान प्रकल्पातून 3.35 दलघमी पाणी आरक्षित करण्याचा निर्णय झाला होता, पण 3 मार्चला देवेंद्र महोदयांनी हे पाण्याचे आरक्षण रद्द केले. हा सरळ सरळ अन्याय आहे. विरोधी बाकांवरील आमदारांच्या मतदारसंघात लोकांना पाणीही मिळू द्यायचे नाही हा विचार अमानुष आहे आणि पाणी मागण्यासाठी निघालेल्या आमदारांना अटक करणे म्हणजे डरपोक हुकूमशहाची दंडुकेशाही आहे. विदर्भातील नेतेच वैदर्भी जनतेचे खरे शत्रू आहेत. अशा राज्यकर्त्यांच्या घशात तेच खारे पाणी ओतायला हवे. नितीन देशमुखांचे तेच पाऊल होते. त्यांना अटक झाली, पण पाण्यासाठी संघर्ष सुरूच राहील!