मुंबई : शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आणि पक्षाचे नाव गोठवण्याचे आदेश निवडणूक आयोगाकडून देण्यात आल्यानंतर आता राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा सगळा डाव रचल्याचा गंभीर आरोप केला आहे.
आयोगाने आगामी अंधेरी पोटनिवडणुकीत दोन्ही गटांना धनुष्यबाण हे चिन्ह आणि शिवसेना हे नाव वापरता येणार नसल्याचा निर्णय दिला आहे. यावरून टीका करताना चंद्रकांत खैरेंनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. “निवडणूक आयोग स्वायत्त असलं, तरी केंद्र सरकारच्या हाताखाली काम करतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सगळ्या यंत्रणा आपल्या हातात ठेवल्या आहेत. मंत्र्यांच्या हातातही काहीही नाही. देवेंद्र फडणवीस त्यांचे खास आहे. देवेंद्र फडणवीसांनी हा सगळा डाव रचला आहे”, असे चंद्रकांत खैरे यांनी यावेळी म्हटले.
तसेच पुढे बोलताना खैरे यांनी, “हे एक प्रकारचं संकट आहे. उद्धव ठाकरे फार संयमी आहेत. संघर्ष करण्याचा त्यांचा पवित्रा असतो. आम्ही उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली संघर्ष करत राहू. एकनाथ शिंदेंनी शिवसेना फोडली. फार मोठं पाप केलं आहे या सगळ्या गद्दारांनी. आत्तापर्यंत धनुष्यबाण चिन्हावर निवडून आलेल्या शिवसैनिकांचं मन दुखतंय. आम्ही सगळ्यांनी निर्धार केला आहे की उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली संघर्ष करू आणि पुन्हा जिंकून येऊ”, असे म्हटले आहे.
एकनाथ शिंदे गटाला धनुष्यबाण हे चिन्ह मिळू शकत नाही. देवेंद्र फडणवीसांचं सरकार, मोदींचं सरकार जर हे सगळं करत असेल, तर जनता २०२४ ला त्यांना दाखवून देईल. यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांचा हात आहे. त्यांना मोदींचा पाठिंबा कितपत मिळतोय, हे माहीत नाही. देवेंद्र फडणवीसांनी असं करायला नको होतं”, अशा शब्गांत खैरेंनी फडणवीसांवर टीकास्र सोडले. “भाजपा असं सगळ्या राज्यातले विरोधी पक्ष संपवायला लागली, तर लोकशाहीचं काय राहिलं? हा लोकशाहीचा खून आहे. या सगळ्यांनी लोकशाहीचा खून केलाय”, असेही ते म्हणाले.