पाटणा ( Amit Shah on Nitish Kumar ) – एकीकडे सत्ताधारी महाआघाडी पूर्णियामध्ये एका व्यासपीठावर एकत्र येऊन भाजपमुक्त भारताची घोषणा करण्याच्या तयारीत असताना दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शनिवारी जेडीयू-आरजेडी युतीवर टीका केली आहे.
बिहारमध्ये पिण्याचे पाणीही स्वच्छ नाही. इथे तेलही बनावट आणि दारूही बनावटच विकली जात आहे. गुन्हेगार शिरजोर झाले आहेत. महिलांसह राज्यात कोणीही सुरक्षित नाही आणि गुंडांना हात लावण्याची बिहारच्या मुख्यमंत्र्यांची हिंमत होत नाही. दर तीन वर्षांनी पंतप्रधान होण्याचे स्वप्न नितीश कुमार यांना पडते, असे शहा म्हणाले.
शाह यांनी केंद्रात 2024 मध्ये पुन्हा नरेंद्र मोदी सरकार स्थापन करण्याचे आवाहन केले आणि केंद्राने चंपारण आणि आसपासच्या भागात केलेल्या विकासकामांची एक-एक गोष्ट सांगितली. ते म्हणाले की, नितीश कुमार केंद्राने पाठवलेल्या रकमेची चुकीची माहिती देऊन विकासकामांमध्ये अडथळा आणत आहेत.
आमच्या पंतप्रधानांनी बिहारला पाठवलेल्या 15 हजार कोटींच्या मदतीत अडसर बनू नका. लोकशाहीत पारदर्शकता असायला हवी, असे ते म्हणाले.
तेजस्वी यादव यांना मुख्यमंत्री करण्याचे आश्वासन दिले असेल तर ती तारीख सांगा. नितीश कुमार हाफ जंगलराजच्या जागी पूर्ण जंगलराज कधी आणणार आहेत, तेही कृपया सांगा, असेही शहा म्हणाले.