दुबई – अमिरातीत सुरू असलेल्या आयपीएल स्पर्धेत अखेरच्या साखळी सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव करत सनरायझर्स हैदराबादने प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला. याबाबत हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने आनंद व्यक्त केला आहे. तसेच स्पर्धेतील प्रत्येक सामन्याबाबत अत्यंत गंभीरपणे खेळ करण्याचा आमचा प्रयत्न होता, त्यामुळेच हे यश मिळाले, असेही वॉर्नरने सांगितले.
आपला खेळ अत्यंत सकारात्मकतेने करण्याचा माझ्यासह संघातील सर्वच खेळाडूंचा प्रयत्न यंदाच्या स्पर्धेत होता, त्यामुळेच एकवेळ गुणतालिकेत तळात असतानाही आम्ही कामगिरी उंचावू शकलो व प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवू शकलो. सामन्यात संघाची स्थिती कशीही असो अखेरच्या चेंडूपर्यंत हार मानायची नाही हाच आमचा प्रत्येक सामन्यात दृष्टिकोन होता, असे वॉर्नरने सांगितले.
वॉर्नरचे सातत्य
सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने आयपीएल स्पर्धेत आपले सातत्य सिद्ध करताना सलग सहा मोसमात पाचशेपेक्षा जास्त धावा फटकावल्या आहेत. त्याने 2014 (528), 2015 (562), 2016 (848), 2017 (641), 2019 (692) व यंदा 500 पेक्षाही जास्त धावा केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा वॉर्नर आयपीएल स्पर्धेच्या आजवरच्या इतिहासातील एकमेव फलंदाज आहे.