पुणे -साहित्य क्षेत्रात 60 वर्षांहून अधिक योगदान देणारे आचार्य डॉ. माधव पोतदार यांचे रविवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. मराठीचे प्राध्यापक असलेले डॉ. माधव पोतदार, गेली अनेक वर्षे संशोधन अभ्यासात व्यग्र होते. आतापर्यंत विविध विषयांवर 183 पुस्तके लिहिली. नुकतेच त्यांचे “कसे जगावे कसे रहावे’ हे 183 वे पुस्तक प्रसिद्ध झाले होते.
डॉ. पोतदार यांनी 15 एप्रिल 2023 ला त्यांनी 90 व्या वर्षात पदार्पण केले होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा आणि मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. रविवारी त्यांच्यावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. कोविड काळात त्यांनी सुमारे 20 पुस्तकांचे लेखन केले. तसेच वयाच्या 87 व्या नॅचरोपॅथीचा अभ्यासक्रम पूर्ण करून प्रमाणपत्र मिळवले होते. मूळचे पेण जवळच्या लहान गावातून आलेल्या डॉ. माधव पोतदार यांनी पेणमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी केली. साहित्यातली डॉक्टरेट मिळवलेल्या डॉ. माधव पोतदार यांनी हजारो विद्यार्थ्यांना अध्यापनाच्या माध्यमातून ज्ञानदान केलेच परंतु, शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर असलेल्या 2 हजार महिलांना पदवीधर करण्याचे शिवधनुष्य पेलले होते.
मंत्र वंदे मातरम, रामरंगी रंगले मन (रामदास), चौदार तळे :एक मुक्तचिंतन, तेजाची आरती, डॉ. आंबेडकरांचे सखेसोबती, सभेत कसे बोलावे? राष्ट्रभक्तीची ज्वाला (सावरकर), आचार्य अत्रे विनोद व तत्त्वज्ञान, पहिला राष्ट्रपुरुष जगन्नाथ शंकरशेट, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील शाहिरांचे योगदान, डॉ. आंबेडकरांच्या कार्यात ब्राह्मणांचा सहभाग, आपली माणसं, अमर शेख व्यक्ती-वाङ्मय, मोठ्यांचे मोठेपण, कसे जगावे कसे रहावे या पुस्तकांचे लेखन त्यांनी केले.