पुणे -महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा व निकालाद्वारे 100 उमेदवारांची सहायक कक्ष अधिकारी पदासाठी नियुक्तीची शिफारस राज्य शासनाकडे केली होती. मात्र त्यातील 29 उमेदवारांनी वेळेत रूजू झालेले नाहीत. त्यांना नियुक्तीसाठी मुदतवाढ देऊनही रूजू न झाल्याने 29 उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
एमपीएससीने सहायक कक्ष अधिकारी संवर्गाच्या 100 पदांसाठी 31 जुलै 2022 रोजी घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला. त्यात 100 उमेदवारांच्या नियुक्तीची घोषणा एमपीएससीने केली. या सर्व उमेदवारांना मंत्रालयीन विभागात सहायक कक्ष अधिकारी पदावर रूजू होण्याचे सूचित करण्यात आले होते. नियुक्तीचे आदेश निघताच 30 दिवसांतच्या आत उमदेवार रूजू होणे अपेक्षित आहे. तसेच रूजू होण्यासाठी मुदतवाढ देण्याची विनंती न केल्यास अशा उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्याची तरतूद असल्याचे सामान्य प्रशासन विभागाने स्पष्ट केले होते.
यातील काही उमेदवारांना 23 मार्च 2023 पर्यंत रूजू होण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर सर्व उमेदवारांनी त्यांच्या पदाचा कार्यभार स्वीकारणे अपेक्षित होते. परंतु 29 उमेदवारांनी नियुक्तीच स्वीकारली नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाने रूजू न झालेल्या 29 उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्यात येत असल्याचे शासन निर्णय प्रसिद्ध करून स्पष्ट केले.
एकीकडे लाखो उमेदवार परीक्षा देऊनही त्यांची निवड होत नाही. मात्र ज्यांना अधिकार पदाची संधी मिळूनही ती डावलली आहे.