नगर – महापालिकेने रविवारी पोलीस बंदोबस्तात शहरातील कापड बाजारासह परिसरातील अतिक्रमण हटविले. अनधिकृत टपऱ्या, शेड, हातगाड्या, रस्त्यावरील ताडपत्र्या, दुकानांसमोरील स्टॅण्ड असे सर्व काही पथकाने काढून टाकत बाजारपेठेतील अंतर्गत रस्ते मोकळे केले. अतिक्रमण विरोधातील ही मोहिम अशीच कायम राहणार असल्याचे यावेळी महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख सुरेश इथापे यांनी सांगितले.
दोन दिवसांपूर्वी कापड बाजारातील व्यापाऱ्यावर हल्ला झाल्यानंतर शनिवारी व्यापारी असोसिएशनचे आक्रमक पवित्रा घेतला. कापड बाजारासह शहाजी रोड, मोची गल्ली, गंजबाजार घास गल्ली आदी ठिकाणचे अतिक्रमण काढून टाका, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली. खासदार डॉ. सुजय विखे यांनी व्यापाऱ्यांना अतिक्रमण हटविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर शनिवारी तत्काळ महापालिकेच्या पथकाने अतिक्रमण काढण्यास प्रारंभ केला. दरम्यान शनिवारी दुपारी पाऊस सुरू झाल्याने अतिक्रमण काढण्यास व्यत्यय आला होता. त्यामुळे महापालिकेच्या पथकाने रविवारी सकाळ 10 वाजल्यापासून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली.
कापड बाजारातील शहाजी रोड, मोची गल्ली, गंजबाजार, घासगल्ली आदी परिसरातील अतिक्रमण काढण्यात आले. अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांच्या पथकाने ही कार्यवाही केली. यावेळी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगारवाला चौकातून कारवाईस सुरूवात झाली. कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्यासह पोलीस अधिकारी व अंमलदारांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
जेसीबीने अतिक्रमण हटविण्यात येत होते. अतिक्रमणात येत असलेल्या हातगाड्या, टपऱ्या, बॅनर, प्लॉस्टिक व पत्र्यांचे शेड काढण्यात आले. दोन ट्रक साहित्य जप्त करण्यात आले आहे. आजही (सोमवारी) अतिक्रमण मोहिम सुरू राहणार असल्याचे इथापे यांनी सांगितले. ही कारवाई अर्जून जाधव, रिजवाण शेख, बाळासाहेब कोतकर, सुभाष झारेकर, दत्ता जाधव, विलास नरसाळे, सुरेश भुतकर, राहुल तनपुरे, अशोक रक्टे यांच्या पथकाने कारवाई केली.