जम्मू – कॉंग्रेस नेत्यांनी शंभर जन्म घेतले तरी भाजप पुन्हा 370 वे कलम लागू होऊ देणार नाही. जम्मू-काश्मीरमध्ये आम्ही कॉंग्रेसला पाकिस्तानी अजेंडा राबवू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंदर रैना यांनी शनिवारी मांडली.
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्या वक्तव्यावर रैना यांनी जोरदार आक्षेप घेतला. पाकिस्तानच्या निर्देशावरून कॉंग्रेसच्या गांधी परिवाराने लिहिलेली कथा दिग्विजय यांनी सादर केली. कॉंग्रेसची पाकिस्तान, दहशतवादी आणि फुटिरतावाद्यांशी हातमिळवणी झाली आहे.
मात्र, भारतमातेच्या विरोधातील कारस्थान यशस्वी होणार नाही. आमच्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आहेत. भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता सैनिकाप्रमाणे देशासाठी बलिदान देण्यास तयार आहे.
कॉंग्रेसचे नेते भारतातील सुविधांचा लाभ घेतात. मात्र, त्यांचा कल पाकिस्तानकडे आहे. पाकिस्तानच्या हातचे बाहुले बनलेल्या कॉंग्रेसला देश माफ करणार नाही, असे ते म्हणाले. जम्मू-काश्मीरमधील जनता कलम 370 हटवण्याच्या निर्णयावर खुष आहे, असा दावाही रैना यांनी केला.