मुंबई – महाराष्ट्राची राजधानी आणि दक्षिण आशियातील मोठे आर्थिक केंद्र असलेल्या “सात बेटांच्या शहराला’ अर्थात मुंबईला नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस “कोरोना’चा मोठा धोका असून या शहरात आणि बृहनमुंबईमध्ये मे किंवा सप्टेंबरसारखी रुग्णांमध्ये वाढ दिसून येईल, असे टाटा इन्स्टिट्यूटने म्हटले आहे. मात्र, जानेवारीपेक्षा नोव्हेंबरमध्ये कोरोनाची तयारी असलेली हॉस्पिटल जास्त असल्याने, प्राणहानीवर नियंत्रण ठेवणे शक्य असेल, असेही त्यांनी म्हटले आहे.
ऑक्टोबर महिन्यातील माहितीवरून टीआयएफआरच्या टीमने हा निष्कर्ष काढला आहे. शहरात कमी अधिक प्रमाणात 80 टक्के झोपडपट्टी आणि 55 टक्के अन्य रहिवाशांमध्ये हर्ड इम्युनिटी जानेवारी 2021 पर्यंत होण्याची शक्यता आहे. मुंबईतील तीन वॉर्डमध्ये कोरोनाने संक्रमित झालेल्या रुग्णांचा अभ्यास करण्यात आला. यावरून गणपतीनंतर जशी कोरोनावाढीची लाट आली तशीच दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याचा धोका आहे.
हा नवा अंदाज नोव्हेंबर आणि जानेवारीमध्ये लोकल ट्रेन सर्वांसाठी सुरु करण्याच्या निर्णयाला विचारात घेवून व्यक्त करण्यात आला आहे. जानेवारीमध्ये शाळा, कॉलेज सुरु झाल्यास हॉस्पिटलायझेशनमध्ये फारशी वाढ होणार नाही. परंतु जानेवारीपेक्षा नोव्हेंबरमध्ये हॉस्पिटलायझेशन आणि गंभीर रुग्णांची संख्या जास्त असेल, असाही अंदाज त्यांनी व्यक्त केला.
करोनाची ही लाट मागील लाटेपेक्षा छोटीही असू शकते, असे टीआयएफआरचे प्राचार्य डॉ. संदीप जुनेजा यांनी सांगितले. याचे मुख्य कारण म्हणजे गणपतीमध्ये अधिकाधिक मुंबईकर कोरोनामुळे धोक्यात होते, यामुळे त्यांच्यात कमी अधिक प्रमाणात प्रतिकारशक्ती विकसित झाली आहे. यामुळे ही लाट थोडीफार छोटी असेल, असे ते म्हणाले.