मुंबई – गेल्या काही दिवसापासून नवीन तंत्रज्ञानावर आधारित कंपन्यांचे आयपीओ बाजारात येत आहेत. या आयपीओच्या शेअरच्या किमती अनेकदा अपेक्षेपेक्षा जास्त असतात. या कंपन्यांची शेअर बाजारावर नोंदणी झाल्यानंतर या शेअरचे भाव बरेच कमी झाल्यामुळे गुंतवणूकदारांचे नुकसान झाले आहे. मात्र या आयपीओमधील शेअरच्या किमती बाजार नियंत्रक सेबी ठरवू शकणार नाही.
या किमती ज्या पातळीवर आहेत त्या का आहेत याचे स्पष्टीकरण या आयपीओ जरी करणाऱ्या इन्व्हेस्टमेंट बॅंकर्सकडून अपेक्षित आहे असे सेबीच्या प्रमुख मधाबी पुरी बुच यांनी सांगितले.
उद्योजकाची संघटना असलेल्या फिक्कीने या विषयावर आयोजित केलेल्या परिसंवादात गुंतवणूकदारांच्या प्रश्नाला उत्तर देताना बुच यांनी सांगितले की, आयपीओची किंमत कोणत्या कारणामुळे विशिष्ट पातळीवर आहे यासंदर्भात स्पष्टीकरणाची अपेक्षा संबंधित कंपन्याकडून आणि इन्वेस्टमेंटबॅंकर्स कडून केली जाते. यासंदर्भात सेबी प्रत्यक्ष हस्तक्षेप करू शकत नाही.
आयपीओ संदर्भात बराच गाजावाजा केल्यानंतर काही गुंतवणूकदार आयपीओ मधील शेअरची खरेदी करतात. मात्र नंतर या शेअरच्या किमती कोसळतात. त्यामुळे गुंतवणूकदारांचे नुकसान होते. याबद्दल चिंता व्यक्त केली जात असतानाच बुच यांनी ही माहिती दिली आहे.
आयपीओ निघण्याअगोदर या कंपन्या काही गुंतवणूकदारांना आपला शेअर 100 रुपयाने भावाने विकतात. मात्र त्यानंतर काही महिन्यातच आयपीओ निघाल्यानंतर याच शेअरची किंमत 450 होते.
दरम्यानच्या काळामध्ये या शेअरची किंमत इतक्या मोठ्या प्रमाणात का वाढली याचे स्पष्टीकरण संबंधित कंपन्या आणि इन्व्हेस्टमेंट बॅंकानी देणे गरजेचे आहे असे उदाहरण त्यांनी दिले. शेअर बाजारातील व्यवहार पारदर्शक गरजेचे आहे. त्या दृष्टिकोनातून सेबी प्रयत्न करीत आहे. आगामी काळात या संदर्भात अनेक उपाययोजना केल्या जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.