डोळ्यासमोर लगेच त्याचं अथांग रूप येतं नाही का! जे रोज रोज समुद्र बघत असतील, त्यांना कदाचित त्याचं कौतुक वाटत असेल की नाही कुणास ठाऊक. पण कधी कधी बघणाऱ्यांना मात्र त्याचं अप्रूप वाटतं. समुद्राची निर्मिती कशी झाली याच्या भौगोलिक कारणात न शिरता तरल भावनेने विचार करू या. समुद्राचं बहुतेक सगळ्यांनाच आकर्षण असतं. लाटांची गाज मनात गुंजत असते. तो आवाजही असतो तसाच. लाटांमध्ये पाय ठेवून उभं राहिलं की, पायाखालून वाळू जाते, तेव्हा खरंच पायाखालची वाळू सरकणे म्हणजे काय याचा अनुभव येतो.
आपल्याकडे खरंतर पाण्याची टंचाई असते पण समुद्र ती गरज भागवू शकत नाही. भा. रा. तांबे यांचे शब्द आठवतात –
समुद्री चहूकडे पाणी
पिण्याला थेंब ही नाही
जनांच्या कोरड्या गप्पा
प्रेमिकांच्या भेटीची जागा सुद्धा हीच बरं का –
जिथे सागरा धरणी मिळते
तिथे तुझी मी वाट पाहाते
समुद्राच्या पाण्याचा रंग नक्की कसा, सांगता येणार नाही हो ना! कारण त्यात आभाळाचे प्रतिबिंब पडलेलं असतं. समुद्राकाठी अस्ताला जाणारा सूर्य बघायला आणि त्याला फोटोत बंदिस्त करायला सगळ्यांना आवडतं. मोठ्या मनाच्या व्यक्तीला कायम समुद्राच्या विशालतेची उपमा दिली जाते.
दुपारी ओहोटी का होते, चंद्र उगवायच्या वेळेस भरती का येते, लाटा इतक्या तुफान का उसळतात, सगळ्याचा आपल्या परीने जमेल तसा अर्थ लावायचा प्रयत्न केला.
समुद्र हा विषय निघाला की एक आठवण ताजी होते. मुरूडचा जंजिरा आपण दुपारी जाऊन व्यवस्थित बघून येऊ शकतो. संध्याकाळी सहा वाजता पूर्ण पाण्याने वेढलेला किल्ला पाहिला की विश्वासच बसत नाही की आपण आतपर्यंत जाऊन आलो किल्ल्यावर. पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी समुद्रात किल्ले बांधलेत या विषयी प्रचंड कौतुक आणि आश्चर्य वाटतं. पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला उधाण का येतं, इतकं की कोळी बांधव आत जाऊच शकत नाहीत. समुद्र जोवर शांत आहे तोवर शांत. त्सुनामी काय असते हे आपण टीव्हीवरील पाहिलयं आणि त्याच्या रागाचा अनुभव घेतलाय. बर्मुडा ट्रॅंगल विषयाचे माणसाचं कुतूहल बहुधा अखेर पर्यंत राहील.
खरंच समुद्राच्या तळाशी काय काय असेल याचा विचार करताना आपली बुद्धी तोकडी पडते, हो ना! कुणी म्हणतात, पूर्वी जी जहाजं बुडाली त्याचे अवशेष आहेत, कुणी म्हणतात सोनं आहे, पाणी वनस्पती आहेत. पण हा नुसता अंदाज. प्रेमी-प्रेमिका समुद्राच्या साक्षीने प्रेमाच्या आणाभाका घेतात. हातात हात घालून मनसोक्त फिरतात.
मोठ्या जहाजात बसून समुद्रातून प्रवास करणं हे तर बहारदारच! दिवसाच्या कुठल्याही प्रहरात समुद्र कसा दिसतो याचं मनोहारी दर्शन घडते.
आपल्या सर्व सणांचा अर्थ कृतज्ञता व्यक्त करणे या भावनेशी आहे. नारळी पौर्णिमा हा तर समुद्राचा सण. त्याची पूजा करून त्याचं महत्त्व आपण जाणतो हे कृतीतून दाखविण्याची.
माणसाने समुद्राचेसुद्धा वाटे करून आपापली मालकी जाहीर केली. हद्द आखून घेतली. इतरांना प्रवेश निषिद्ध केला. प्रत्येक समुद्राला वेगळं नाव.
समुद्र किनाऱ्यावर बसून लाटांच्या तासन्तास निरीक्षण करत आठवणीत मन बुडून जातं त्यात किती वेळ निघून गेला हे कळत नाही.
एवढं प्रचंड पाणी असलेला समुद्र खारट का, याचं उत्तरही आपण आपल्या परीने शोधायचा प्रयत्न केला.
असा हा गूढ “समुद्र’.
डॉ. नीलम ताटके