अलीकडेच एका बातमीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं, ती म्हणजे महाराष्ट्रात टोळधाडीचं झालेलं आगमन. पिकांचं नुकसान आणि माणसांच्या जीवाला धोका अशा दुहेरी कचाट्यात आपले काही जिल्हे अडकले. नैसर्गिक संकटं तर येतच राहणार; पण आपण माणसं बुद्धिमत्तेचा वापर करून यावर काही उपाय करू शकतो का, अशी आशा वाटणं स्वाभाविक आहे.
इथेही पुन्हा तंत्रज्ञान मदतीला येत आहे. टोळांच्या प्रवासाचा रोख कुठे आहे हे आधी समजलं तर त्यानुसार कारवाई करता येते, प्रतिबंधात्मक उपायांचा विचार करता येतो. म्हणून त्यासाठी हल्ली काही देशांमध्ये सुपर कॉम्प्युटर आणि एआयचा (आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा) वापर केला आहे. उपग्रहांकडून मिळालेला डेटा वापरून ही यंत्रणा हवामानाचा अंदाज घेते. नंतर वाऱ्याचा वेग, पाऊस, तापमान आणि आर्द्रता अशा घटकांचा विचार करून जागोजागीचं वातावरण हे टोळांसाठी योग्य आहे का, याचा ती आदमास घेते आणि मग त्यावरून टोळांचा पुढील हल्ला कोणत्या परिसरात होईल याचं भाकित करते. हवामानतज्ज्ञ आणि टोळांचे अभ्यासक यांच्या मदतीने हे मॉडेल विकसित करण्यात आलं आहे.
केनियात तीन महिन्यांपूर्वी अशाच टोळधाडीचा धोका होता. एखाद्या मोठ्या गावाला पूर्ण व्यापून टाकील इतक्या प्रचंड संख्येने टोळ झेपावत होते. त्यावेळी या एआय यंत्रणेचा फायदा झालेला दिसून आला आहे. सुमारे दहा दिवस आधी धोक्याचा इशारा मिळाल्याने घरात कडेकोट बंदोबस्त करणे, योग्य वेळी कीटकनाशकांची फवारणी करणे, गुरांना सुरक्षित जागी हलवणे या गोष्टी नीट योजून करता आल्या.
सोमालिया, टांझानिया, सुदान, युगांडा असे अनेक आफ्रिकन देश या टोळधाडींचाच सामना करत आहेत. त्यांना अशा भाकितांचा थोडा जरी उपयोग झाला तरी कित्येक जीव आणि लाखो टन पिकं वाचवता येतील.
दरम्यान, काही युरोपियन संशोधक एआय यंत्रणा वापरून टोळासारख्या कीटकांच्या झुंडीचा अभ्यास करत आहेत. ही झुंड दिशा कशी ठरवते, ही माहिती सर्वांपर्यंत कशी जाते, त्यात नियोजनबद्ध वर्तन किती आणि यादृच्छिक वर्तन (रॅंडम बिहेविअर) किती, या बाबींचा सखोल अभ्यास झाला तर ती माहिती वरच्या भाकितांसाठी पूरक ठरू शकेल, असा विश्वास या संशोधकांना आहे.
आपल्याकडे कीटकनाशकांच्या फवारणीसाठी ड्रोन्सचा वापर करण्याची योजना आहे आणि विदर्भात काही जागी अशा उपायांनी खरीप पिकांची नासाडी टाळण्यात यश आलं आहे. ड्रोन्सचं नियंत्रण अगदी सहजपणे दुरून करता येतं, त्यामुळे प्रत्यक्ष टोळांची धास्ती नसते. उंचावरून निरीक्षण करून ड्रोन्स टोळांच्या हल्ल्याचा आढावा घेऊ शकतात, इतकंच नव्हे तर त्यांच्या आगमनाची पूर्वसूचना देऊ शकतात. शिवाय आर्थिकदृष्ट्या ड्रोन्स आता आवाक्यात येत आहेत. हे एक तंत्रज्ञान शेतकऱ्यांना खरोखरीच दिलासा देत आहे. तंत्रज्ञानाचा आधार घेतच हे संकट परतवून लावायचं आहे.
– मेघश्री दळवी