भोपाळ – करोना संकट ध्यानात घेऊन मध्यप्रदेशातील शाळा पुढील वर्षाच्या 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. तो निर्णय इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांसाठी लागू राहील.
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शाळांविषयीचा निर्णय जाहीर केला.
इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे नियमित वर्ग मार्च अखेरपर्यंत भरणार नाहीत. त्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जाणार नाहीत. त्यांचे मूल्यमापन प्रोजेक्ट वर्कच्या आधारे केले जाईल. इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांसाठी लवकरच वर्ग सुरू करण्यात येतील.
मात्र, करोना फैलाव रोखण्यासाठी त्या इयत्तांच्या वर्गांमध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि इतर नियमांच्या पूर्ण पालनाची निश्चिती केली जाईल. इयत्ता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकवेळ किंवा दोनवेळा शाळांमध्ये हजेरी लावता येऊ शकेल, असे चौहान यांनी स्पष्ट केले.