संदीप राक्षे
सातारा – विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत ( MLC election results 2020 ) अतिआत्मविश्वासामुळे भाजपला ( BJP ) सपशेल तोंडघशी पडावे लागल्याचे निकालांवरून स्पष्ट झाले आहे.
सांघिक कामगिरीमुळे प्रतिष्ठेच्या लढाईत महाविकास आघाडीने ( MVA ) बाजी मारली. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ( NCP ) पॉवरफुल खेळीने भाजपला पुन्हा एकदा आसमान दाखविले. राज्यातील विधानपरिषदेच्या पाच जागा महाविकास आघाडीकडे गेल्याने या निकालांनी भाजपला निश्चितच आत्मपरीक्षण करावयास भाग पाडले आहे.
भाजपच्या वहिवाटीच्या पुणे पदवीधर मतदारसंघात ( MLC election results 2020 ) केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दोनदा, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दोनदा प्रतिनिधित्व केले. तब्बल दोन अडीच दशके हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात होता. मागील निवडणुकीच्या वेळी झालेल्या चुका टाळायच्या हे ठरवूनच राष्ट्रवादीच्या रणनीतीनुसार शिवसेना व कॉंग्रेस यांनी एकत्रितपणे प्रचार करून सूत्रबद्ध आखणी केली.
अरुण लाड ( arun lad wins MLC election 2020 ) यांना मतविभाजनाचा फटका बसणार नाही याची काळजी घेत महाविकास आघाडी एकसंघपणे त्यांच्यामागे उभी राहिली. अरुण लाड यांनी एक लाख 22 हजार 145 मते मिळविताना पहिल्या पसंतीचा एक लाख 14 हजार 937 मतांचा कोटा पूर्ण केला. भाजपचे संग्राम देशमुख यांना 73 हजार 321 मते मिळाली. लाड यांनी 48 हजार 823 मतांच्या फरकाने देशमुख यांचा पराभव केला.
या निवडणुकीत ( MLC election results 2020 ) भाजप विरूध्द महाविकास आघाडी असा चुरशीचा सामना रंगला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी प्रचाराची सर्व यंत्रणा हातात घेऊन पाच जिल्ह्यांत जोरदार प्रचार केला. मोठी यंत्रणा राबवूनही संग्राम देशमुख यांच्या विरोधात व्यूहरचना करण्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कमालीचे यशस्वी ठरले.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री व आमदार आशिष शेलार यांनी पश्चिम महाराष्ट्रात प्रचाराची राळ उठविली. मात्र, जयंत पाटील यांनी सांगलीत तळ ठोकून एकसूत्री प्रचार यंत्रणा राबवताना कोल्हापूर, सातारा, सोलापूर या तिन्ही जिल्ह्यांत संपर्क मोहिमांद्वारे उत्तम समन्वयं ठेवला. सांगलीच्या पाटलांनी कोल्हापूरच्या पाटलांना दिलेला धक्का पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला.
लाड- देशमुख यांच्या दुरंगी सामन्यात अरूण लाड हा सर्वसमावेशक चेहरा प्लस पॉईंट ठरला. पाटलांनी लाड यांच्यासमवेत सांगली, सोलापूर व कोल्हापूर या तीन जिल्ह्यांत प्रचारासाठी भिंगरी लावली. देशमुख यांच्या विरोधात वातावरण तयार करण्यात अरूण लाड यांना यश आले. तर साखर कारखान्यातील स्थानिक प्रश्नांनी देशमुख यांची मोठी अडचणं झाली. हे कच्चे दुवे हेरूनच जयंत पाटलांनी अचूक रणनीती आखत भाजपच्या चंद्रकांत पाटलांना चांगलाच धक्का दिला. सांगलीचे पाटील कोल्हापूरच्या पाटलांना भारी पडल्याचा संदेश या निवडणुकांच्या निमित्ताने गेला.
उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांच्यासह ग्राम विकास मंत्री हसन मुश्रिफ, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, राज्यमंत्री राजेंद्र पाटील (यड्रावकर ) अशा मात्तबर नेत्यांनी झंझावती प्रचार केला. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हातात हात घालून काम केल्याने पदवीधर व शिक्षक मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीला मोठा विजय मिळाला.
संग्राम देशमुख यांच्यासाठी फडणवीस यांच्यासह भाजपच्या धुरिणांनी जंग जंग पछाडलं. मात्र, राष्ट्रवादीच्या पॉवरफूल फळीपुढे भाजपची जादू चालली नाही. सांगली जिल्ह्यातील भाजपचे नेते देशमुख यांच्या व्यासपीठावर होते.
मात्र, पक्षांतर्गत गटबाजी लपून राहिली नाही. देशमुख यांच्या साखर कारखान्याने शेतकऱ्याचे पैसे थकविल्याचा विरोधकांचा आरोप भाजपसाठी आणखी अडचणीचा ठरला. याउलट अरुण लाड यांना वडील क्रांतिअग्रणी जी. डी. लाड यांचा वारसा, साखर कारखान्याचा उत्तमरितीने सांभाळलेला कारभार, सर्वसमावेशक व संयमी चेहरा, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे पाठबळ, राष्ट्रवादीच्या गटातंटानी मतभेद बाजूला ठेवून एकजिनसीपणे केलेला प्रचार कामी आला.
भाजप निष्ठावतांची नाराजी भोवली
आयातांना उमेदवारी देण्याचा पायंडा मुळच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना पटली नाही. ही खदखद विधानसभा निवडणुकांपासून कायम होती. मेधा कुलकर्णी यांच्या तीव्र नाराजीने पुण्यात भाजपचे मूळ निष्ठावंत प्रचारापासून जरा हटकूनच राहिले.
पदवीधर व शिक्षकची पुण्यात सर्वाधिक मतदारांची नोंदणी मतदानामध्ये परावर्तित करण्यात भाजपच्या यंत्रणेला अपयश आले. ज्या मतदारांवर भिस्त होती ते मतदान केंद्राकडे न फिरकल्याचा फटका भाजपला बसला.
मेधा कुलकर्णी यांनी चंद्रकांत पाटील यांच्यासाठी आपल्या इच्छेला मुरड घातली. चंद्रकांत पाटील यांच्या विधानसभेतील प्रवेशानंतर पदवीधरच्या जागेवर कुलकर्णी यांचाच प्रबळ दावा होता. मात्र, त्यांना डावलून सांगली जिल्ह्यात दिलेली उमेदवारी भाजपच्याच कार्यकर्त्यांना पसंत पडली नव्हती.