नवी दिल्ली – करोना प्रसाराचा धोका अजून कमी झालेला नसल्याने दिल्लीतील शाळा पुढील आदेश येईतोपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी म्हटले आहे.
आज येथे पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, या शाळा इतक्यात सुरू करण्यास मुलांच्या पालकांचाही विरोधच आहे. शाळा सुरू ठेवल्या तर मुलांमधील करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर पालकांनी या शाळा इतक्यात सुरू करायला विरोध दर्शवला आहे.
त्यामुळे सगळ्या बाजूंचा विचार करून सध्या तरी शाळा बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याविषयी नंतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे त्यांनी सांगितले. सध्या लागू असलेल्या आदेशानुसार 31 ऑक्टोबरपर्यंत शाळा बंद राहणार आहेत.
पण ही मुदत आता वाढवण्यात आली आहे. या आधी 21 सप्टेंबरपासून नववी ते बारावीपर्यंत विद्यार्थ्यांसाठीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय झाला होता. पण नंतर तोही रद्द करण्यात आला आहे.