पुणे – भाजपकडून मराठा समाजाची दिशाभूल केली जात असून, “मराठा आरक्षण’ या विषयात भाजपने आग लावण्याचे काम करू नये, अशी टीका कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी बुधवारी केली.
कॉंग्रेस भवन येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाविकास आघाडीच्या माध्यमातून मराठा आरक्षणाची लढाई लढली जात आहे, याची पोटदुखी भाजपला होत आहे. त्यामुळेच ते राज्य सरकारच्या विरोधात अपप्रचार करत आहेत.
वास्तविक फडणवीस सरकार असताना आम्ही आरक्षणाच्या विषयाला एकमुखाने पाठींबा दिला होता. तरीही त्यांनी आम्हांला विश्वासात घेतले नव्हते. आम्ही मात्र त्यांच्याशी प्रत्येकवेळी सल्लामसलत करतो, असे सावंत म्हणाले.
भाजपमधील मराठा नेते हे मनाने भाजपचे आहेत त्यांच्यातच एकमत नाही; दिशाभूल करण्यात मात्र एकमत आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर केंद्राची आणि मोदी सरकारची भूमिका काय आहे, हे भाजप नेत्यांनी स्पष्ट करावे, अशी मागणी सावंत यांनी केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्रपती संभाजी राजेंना भेटीसाठी वेळही देत नाहीत
छत्रपती संभाजी राजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटीची वेळ देण्यासंदर्भात तीनवेळा पत्र पाठवले. परंतु, त्यांनी वेळ दिली नाही. यावरून मोदी सरकार मराठा आरक्षणासाठी उत्सुक नाही. वास्तविक घटना पीठाकडे गेलेले दोन्ही प्रश्न केंद्र सरकारशी संबंधित आहेत. मराठा आरक्षणाचे अधिकार राज्याला आहेत की नाहीत याची स्पष्टता केंद्राने करावी.