पुणे – राज्यातील शाळांतील इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग येत्या दि. 27 जानेवारीपासून सुरू होतील. करोना संबंधित सर्व खबरदारी घेऊन वर्ग उघडले जातील, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज “ट्विट’द्वारे दिली. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणे शाळेत जाऊन शिकता येणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर हा शाळा उघडण्यासंबंधिचा प्रस्ताव मांडण्यात आला. करोनासंदर्भातली खबरदारीच्या सर्व उपाययोजना अंमलात आणून, सर्व नियम पाळूनच शाळा सुरू करा, अशा सूचनाही यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे गायकवाड यांनी म्हटले आहे. शाळा सुरू करीत असताना विद्यार्थ्यांच्या आरोग्य सुरक्षिततेत कुठलीही कसूर राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेत असताना करोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती पूर्वतयारी करणे, स्थानिक प्रशासनाने तयारीची जबाबदारी घेणे, पालकांची संमती आणि शिक्षकांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात विविध नियमावली लवकरच निर्गमित करू, असेही गायकवाड यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असताना यापूर्वीच शालेय शिक्षण विभागाने इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आता इयत्ता पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू होतील.