सातारा (प्रतिनिधी) – लॉकडाऊनमध्ये शाळा आणि महाविद्यालये बंद असल्या तरी त्यांच्या इमारती सुस्थितीत रहाव्यात यासाठी पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती करावी. दुरुस्तीचे काम मोठे असेल तर परवानगी आवश्यक आहे, अशा सूचना माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांनी दिल्या आहेत. दरम्यान, लॉकडाऊन कधी मागे घेतला जाणार आणि शाळा कधी सुरू होणार, याची उत्सुकता पालक व विद्यार्थ्यांना आहे.
शाळा व महाविद्यालयांच्या इमारतींच्या दुरुस्तीबाबत क्षीरसागर यांनी शिक्षण संस्थांचे पदाधिकारी, प्राचार्य व मुख्याध्यापकांना सूचना दिल्या आहेत. आगामी शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेची काळजी घ्यावी. शालेय इमारती, संरक्षक भिंती, पत्रे इत्यादींची दुरुस्ती करावी. मोठ्या दुरुस्तीसाठी परवानगी घ्यावी. अवकाळी पावसात इमारतींचे नुकसान होऊ नये याची खबरदारी घ्यावी.
शाळांचा परिसर, मैदानांमध्ये पावसाचे पाणी साचू नये यासाठी उपाययोजना कराव्यात. कार्यालयातील कागदपत्रे, विद्यार्थ्यांशी संबंधित अभिलेख सुरक्षित ठेवण्याची दक्षता घ्यावी. शालेय पोषण आहार शिल्लक असल्यास योग्य कार्यवाही करावी. इमारतींची स्वच्छता करावी. आवश्यकता भासल्यास रंगरंगोटी करावी. इयत्ता पाचवी ते दहावी प्रवेशासाठी ऑनलाइन लिंक तयार करून शाळेच्या दर्शनी भागात प्रदर्शित करावी. लॉकडाऊनच्या काळात प्रवेशासाठी विद्यार्थी व पालकांना शाळेत बोलावू नये, अशा सूचना क्षीरसागर यांनी केल्या आहेत.