बदलत्या काळानुसार चित्रपटातही बहीण-भावाच्या नात्यात बराच बदल झाला आहे. 1990 च्या दशकात चित्रपटातील भाऊ हा बहिणीसाठी मार खातो, शिव्या खातो, हात पसरतो. बहिणीच्या लग्नासाठी जिवाचा आटापिटा करतो. त्याचवेळी बहीणदेखील भावाच्या ऐकण्यातली. साधी, सरळ आणि नियमित कॉलेजला जाणारी बहिणीचे भावावर जिवापाड प्रेम असते.
राखीपौर्णिमेला राखीच्या बदल्यात बक्षीस घेण्यासाठी ती भावाकडे हट्ट करते. त्याचवेळी शालिन, समंजस बहिणीला मात्र भाऊ आणि कुटुंबावर एकप्रकारचे ओझे असल्याचे दाखवले गेले. आज अनेक बदल झाले आहेत. बहिणीसाठी जिवाचा आकांत करणारा भाऊ आता इतिहासजमा झाला आहे. आता आधुनिक विचारांचे बहीण-भाऊ चित्रपटात अवतरले आहेत. दोघे कितीही भांडत असले तरी मनातून मात्र एकामेकांवर प्रेम असते, हे निश्चित. एकमेकांच्या भावना, गोष्टीदेखील शेअर करतात. ते मित्रांप्रमाणेच राहतात.
भारतीय सणवारांचे प्रतिबिंब बॉलीवूडमध्ये पाहावयास मिळते. मग दिवाळी असो, होळी असो किंवा राखीपौर्णिमा असो. राखीपौर्णिमा हे बहीण-भावाचे अतूट नाते व्यक्त करणारा सण. पण चित्रपटाच्या दृष्टीने विचार केल्यास 1990 च्या दशकात पडद्यावर साकारलेले बहीण-भाऊ आणि आता साकारले जाणारे बहीण-भाऊ यात खूपच फरक आहे. शेवटी स्वरूपात बदल झाला असला तरी दोघांचा एकच आधार, ते म्हणजे आपुलकीचे नाते. ते अजून घट्ट आहे.
रणबीर कपूर आणि करिना कपूर
बॉलीवूडमध्ये कपूर कुटुंबाचा दबदबा आहे. तीन पिढ्यांपासून कपूर कुटुंबातील कलाकारांनी चित्रपटात मोठे योगदान दिले आहे. कपूर कुटुंबातील सर्वच जण चित्रपटसृष्टीत सक्रिय आहेत. यापैकीच ऋषी कपूर यांचे चिरंजीव रणबीर आणि रणधीर कपूर यांची कन्या करिना कपूर ही बहीण-भावाची जोडी प्रसिद्ध आहे. करण जोहरच्या टॉक शोमध्ये हे दोघेही एकत्र आले होते. करिना कपूरच्या लग्नात रणबीरने धमाल केली आणि स्वत: वरातीत नाचून लग्नसोहळ्याचा आनंद लुटला. हायप्रोफाइल कुटुंबातील भावंडाचे नाते अतूट आहे आणि ते पदोपदी दिसते.
साजिद आणि फराह खान
बॉलीवूडमधील साजिद आणि फराह खान ही बहीण-भावाची जोडी प्रसिद्ध आहे. दोघांपैकी कुणीही एक जण वादाच्या भोवऱ्यात अडकले तर ते एकमेकांना सांभाळून घेतात. अनेक वादग्रस्त मुद्द्यांचा निपटारा त्यांनी एकत्रितपणे दूर केला आहे.
अर्जुन कपूर आणि सोनम कपूर
अर्जुन कपूर आणि सोनम कपूर हे भाऊ-बहीण खूपच प्रेमळ आहेत. त्यांनी कधीही नात्याचा माध्यमांसमोर देखावा केला नाही. ते दोघे एकमेकांची खूप काळजी घेतात. अलिया भटशी अफेअर असल्याच्या वावड्या उठल्यानंतर अर्जुन कपूर गोत्यात आला होता. तेव्हा सोनम कपूर ही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली.
अभिषेक बच्चन-श्वेता बच्चन
अभिषेक च्चन आणि श्वेता नंदा हे सेलि्रिटी किड्स म्हणून ओळखले जातात. बच्चन नावातच सर्वकाही आले. श्वेताने प्रसिद्ध उद्योगपती निखील नंदाशी विवाह केला आणि त्यांना दोन मुले आहेत. अभिषेकने ऐश्वर्याशी विवाह केला आणि त्यांना एक मुलगी आहे. अभिषेक हा चित्रपटात फार चालला नाही तर श्वेताने चित्रपटात फारशी रुची दाखवली नाही.
फरहान अख्तर आणि झोया अख्तर
अष्टपैलू अभिनेता फरहान अख्तरचे बहीण झोया अख्तरवर जिवापाड प्रेम आहे. फरहानने आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात दिग्दर्शक म्हणून सुरू केली. त्यावेळी झोयाने त्याच्या कामात मदत केली. “लक्ष्य’सारख्या चित्रपटात तिने सहायकाची भूमिका वठवली.
सोहा आणि सैफ अली खान
बॉलीवूडमधील प्रसिद्ध भावंडापैकी सोहा अली आणि सैफ अलीची जोडी आहे. ते दोघेही चित्रपटात काम करतात आणि सोहा ही वेळोवेळी सैफकडून मार्गदर्शन घेते. दोघाचे नाते हे अन्य बहीण-भावाप्रमाणेच घट्ट आहे. ते दोघे सार्वजनिकरित्या फारसे व्यक्त होत नाहीत.
सलमान खान-अर्पिता
खान-अल्विरा खान
सलमान खान आणि त्याच्या बहिणी अर्पिता खान, अल्विरा खान हे तिघे भावंड नेहमीच चर्चेत असतात. अर्पिताने आयुष शर्माशी विवाह केला तर अल्विरा खानने अतुल अग्निहोत्रीशी लग्नगाठ बांधली. सलमान हा अल्विराला बेबी म्हणून हाक मारतो. सलमानने आयुषसाठी 2018 मध्ये “लव्ह यात्री’ नावाचा चित्रपट काढला.
जोश
शाहरुख खानचा “जोश’ आठवत असेल. यात ऐश्वर्या ही त्याची बहीण दाखवली आहे. अर्थात दोघांची मस्ती आणि धमाल ही प्रेक्षकांना खूपच भावली.
फिजा
“फिजा’मध्ये हृतिक रोशन आणि करिश्मा कपूर हे भावंड म्हणून पडद्यावर आले. एक बहीण भावाला दहशतवाद्याच्या मार्गापासून परावृत्त करते. ती त्यात यशस्वी ठरते.
हम साथ साथ है
“हम साथ साथ है’सारखा कौटुंबिक चित्रपट तर सर्वांच्या स्मरणात असेल. यात नीलम ही तीन भावांच्या पाठिंब्यावर आयुष्यातील खडतर मार्ग सहजपणे पार करते. या चित्रपटातील बहीण भावाचे अतूट नाते पाहून वास्तविक जीवनातील तणाव काही प्रमाणात दूर होतो.
प्यार किया तो डरना क्या
या चित्रपटात अरबाज खान आणि काजोल यांचे बहीण-भावाचे नाते सुंदररित्या साकारले आहे. अरबाज हा बहीण काजोलसाठी मुलाचा शोध घेत असतो. काजोलला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याचा तो सतत विचार करत असतो. शेवटी प्रत्येक भावाला आपली बहीण खूश राहावी, असेच वाटत असते.