केपटाऊन – भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत ज्या पद्धतीने संथ फलंदाजी करत होता त्यावर नेटीझन्सनी टीका केली आहे. कोहली चेतेश्वर पुजारासारखा फलंदाजी करत आहे, अशा शब्दात त्याच्यावर सध्या ताशेरे ओढले जाऊ लागले आहेत.
पहिली कसोटी खेळल्यानंतर दुखापतीमुळे कोहलीने दुसऱ्या कसोटीतून माघार घेतली होती. त्यानंतर पूर्ण तंदुरुस्त ठरल्यावर त्याने तिसरी व अंतिम कसोटी खेळण्याचा निर्णय घेतला. त्याने या कसोटीत पहिल्या डावात अर्धशतकी खेळी केली व दुसऱ्या डावात 29 धावांची खेळी केली.
यात त्याने जणू पुजाराचाच वारसा चालवत असल्याप्रमाणे संथ फलंदाजी केली. त्याने दोन्ही डावांत मिळून 108 धावा केल्या व त्यासाठी त्याने तब्बल 344 चेंडू खेळले आहेत. त्यात त्याने 16 चौकार व 1 षटकार फटकावला आहे.
त्याची फलंदाजी पाहताना असे वाटत होते की कोहली नव्हे पुजाराच फलंदाजी करत आहे. कोहलीने पहिल्या डावात फटकावलेली अर्धशतकी खेळी त्याच्या आजपर्यंतच्या कसोटी कारकीर्दीतील सर्वात संथ खेळी ठरली आहे.