सणबूर -आपल्या हक्काच्या पाटण गावातच शिवसेनेचे मताधिक्य वाढू लागल्यामुळे पाटणकरांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे. त्यामुळेच ते बेताल आरोप करीत सुटले आहेत. आम्हाला सेवानिष्ठा शिकविणाऱ्या सत्यजितसिंह पाटणकर तुम्ही पाटण नगरपंचायतीवर ज्या पक्षाची सत्ता आली आहे म्हणून टिमकी वाजवताय त्या पक्षाच्या चिन्हावर एक तरी सदस्य तुमचा निवडून आला आहे का?
ज्या पक्षाच्या नावावर मोठे झाला त्या पक्षाचे नावच गायब करणारे आपले निष्क्रिय कर्तृत्व आता पाटण शहरातीलच नव्हे तर आता संपूर्ण जिल्ह्याने पाहिले आहे. नगरपंचायतीच्या निवडणूकीमध्ये पाटणमध्ये शिवसेना पक्षाला वाढलेल्या मताधिक्याने सत्यजितसिंहाचा थयथयाट सुरु आहे. असा पलटवार गृह राज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी सत्यजितसिंह पाटणकर यांच्यावर पत्रकाद्वारे केला आहे.
मंत्री देसाई म्हणाले, पाटण नगरपंचायतीच्या निवडणुकीत आम्ही कुठेही राजकीय सभा कार्यक्रम घेतले नाही.मात्र आम्हाला या निवडणुकीत सत्तेचा राजकीय वापरच करायचा असता, तर तो आम्हाला बॅंकेत अथवा कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी बसून करायची गरज भासली नसती. तर तो आम्ही थेट आणि करेक्टच केला असता, हे तुमच्यासहित तुमच्या बगलबच्च्यांनाही ही माहीत आहे. सत्यजितसिंहाचं अस झाले आहे.
की स्वत:च ठेवायच झाकून दूसऱ्याच बघायच वाकून अशीच अवस्था झाली आहे. कारण निवडणूक कोणतीही असो मग पाटणमध्ये मतदान मिळविण्यासाठी आपल्या बगलबच्च्यांमार्फत सामान्य जनतेला मतदान करण्याकरीता वेठीस धरण्यासाठी खालच्या पातळीचे कशा पध्दतीने राजकारण करण्यात येते ते पाटणवासियांनी यापुर्वी अनुभवले आहे. ते वेगळ सांगायची गरज नाही.
सत्यजित पाटणकर तुम्ही मरळी गावाची काळजी अजिबातच करू नका ते लोकनेत्यांचे आणि त्यांच्याच विचारांचे गाव आहे आणि त्यासाठी आम्ही सक्षम आहोत, हे अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे. मात्र ज्या पाटण च्या भक्कम बालेकिल्ल्याची भाषा करणाऱ्या निष्क्रिय विरोधकांनी आपल्या बालेकिल्याचे बुरुज पहिल्यांदा तपासून पाहावेत कारण जे आपले उमेदवार निवडूण आले आहेत ते किती मतांच्या फरकाने निवडूण आले आहेत याचा गवगवा का करत नाही. त्यामुळे नेमके कुणाला मतदारांनी नाकारले आहे हे लवकरच जनतेलाही कळेल असा सूचक इशारा ही मंत्री देसाई यांनी दिला.