सातारा – मी कोणाला काय द्यायला कमी पडलो हा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडलेल्यांना विचारा. जे जे लोक पक्ष सोडून गेले त्याठिकाणी नवीन चेहरे देऊन त्यांना निवडून आणून पक्षाची ताकद दाखवून दिली जाईल, अशी गर्जना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी सातार्यात केली. पक्ष सोडून गेलेत त्यांचा आता विचार नसून नव्या दमाने सर्वांना एकत्रित घेऊन आगामी निवडणुका ताकदीने लढवल्या जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सातारा शासकीय विश्रामगृहात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले, ‘‘गेल्या पन्नास वर्षाहून अधिक काळ आम्ही धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येऊन निवडणुका लढवल्या आहेत. आजही आमची भूमिका बदलली नाही. काही मंडळींनी पक्षाशी फारकत घेऊन वेगळी भूमिका घेतली असली तरी त्यांना काय द्यायला कमी पडलो हे प्रसारमाध्यमांनीच त्यांना विचारावे. काँग्रेस, राष्ट्रवादी, उध्दव ठाकरे यांची शिवसेना एकत्र येऊन आगामी निवडणुका लढवल्या जातील. आणखी काही समविचारी पक्ष, संघटनांना बरोबर घेण्यात येणार आहे. येत्या मंगळवारी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची बैठक होणार असून देशात भाजपला भक्कम पर्याय दिला जाईल.
विधानसभा निवडणुकांच्या आज झालेल्या निकालात भाजपलाही अपेक्षेइतके यश मिळालेले नाही. तेलंगणा राज्यात काँग्रेसने शिरकाव केला आहे. काही ठिकाणी इव्हीएमबाबत तक्रारी आहेत. मात्र, याबाबत आताच बोलणे उचित होणार नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, सत्यजितसिंह पाटणकर, तेजस शिंदे, राजकुमार पाटील, डॉ. नितीन सावंत आदी उपस्थित होते.
सातारा लोकसभा लढवणारच
सातारा जिल्ह्याला वेगळी परंपरा आहे. या जिल्ह्याने भरपावसात राष्ट्रवादी काँग्रेसला साथ दिली असून प्रत्येक पक्षाला निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचा अधिकार आहे. त्याप्रमाणे काहींनी भूमिका जाहीर केल्या असतील. सातारा जिल्ह्यातील जनमानसाचा आमच्यावर व राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास असून आम्हीही सातारा लोकसभा मोठ्या ताकदीने लढणार आणि जिंकणार आहे, असा निर्धार शरद पवार यांनी व्यक्त केला.
उदयनराजेंचे कुठं कुठं मन लागत नाही
सातारा लोकसभेसाठी भाजप, अजित पवार गट राष्ट्रवादी आणि शिवसेनाही उमेदवार उभा करणार आहेत. त्यामुळे खासदार उदयनराजे भोसले यांनी गोची होणार आहे, त्यामुळे त्यांना तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेणार का या प्रश्नावर शरद पवार म्हणाले, इतर पक्षांनी कोणाला उभे करायचे हा त्यांचा प्रश्न आहे, आम्ही आमचा उमेदवार उभा करणार, कोणाला बरोबर घेऊन उमेदवार उभा करणार आणि निवडून कसा आणायचा हाच पेच आमच्यापुढे आहे. बाकीच्यात आम्ही लक्ष घालत नाही.
खासदार उदयनराजे भोसले सध्या भाजपवर नाराज असून त्यांचे मन लागत नाही, त्यामुळे आगामी लोकसभेसाठी त्यांना राष्ट्रवादीत घेणार का, असा आमचा प्रश्न होता असे श्री. पवार यांना सांगताच शरद पवार यांनी मिश्कीलपणे उत्तर दिले. त्यांचे कुठं कुठं मन लागत नाही याची मला खासगीत माहिती द्या, असे शरद पवार म्हणतच म्हणताच एकच हशा पिकला.