प्रशांत ढावरे
लोणंद – लोणंदच्या वाहतूक कोंडीचे ग्रहण सुटणार तरी कधी ? असा संतप्त सवाल लोणंदकरांना गेल्या अनेक वर्षांपासून पडलेला आहे. लोणंदमधील वाहतूक कोंडीची समस्या हे नित्याचे दुखणे झालेले आहे. कोंडी सोडवण्यासाठी लोणंदमधे सम विषम पार्किंग व्यवस्था लवकरात लवकर लागू करणे आवश्यक असून त्याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी नागरिक, व्यापारी करत आहेत.
लोणंद पोलीस स्टेशनच्या मागणी वरून थर्मोप्लाष्टिक पेंटचे पट्टे आणि झेब्रा क्राॅसिंग करण्यासाठी नगरपंचायतीने १ लाख ९३ हजार रुपयांची निविदा काढली होती त्यालाही खूप वर्ष उलटून गेली आहेत. तसेच लोणंद सातारा मार्गावरील लोणंद शहरातील रस्त्यावर असणारे विद्युत पोल बाजूला करण्यासाठी १६ लाख रूपये खर्चाच्या प्रस्तावाला नगरपंचायतीकडून मान्यता देण्यात आली होती त्यालाही बराच कालावधी झाला. साधारणतः चार वर्षांपूर्वी बांधकाम विभाग, वीज वितरण, तहसीलदार, नगरपंचायत व पोलीस यांच्यात संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते तेव्हा वाहतुकीची समस्या सुटण्याची आशा निर्माण झाली होती.
परंतु पुढे तीन-चार वेळा संयुक्त बैठका होण्यापलीकडे आजपर्यंत कसलीच हालचाल न झाल्याने यामध्ये सुधारणा होण्याची सुतराम शक्यता सध्या तरी दिसत नाही. बहुतेक वेळेस बांधकाम विभाग, वीज वितरण, तहसीलदार, नगरपंचायत व पोलीस यांच्या संयुक्त बैठकीत अनेकदा बांधकाम विभाग व वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी दांडी मारली असल्याने वाहतूक कोंडीची समस्या अद्याप आजपर्यंत जैसे थे राहिलेली आहे.
लोणंद हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने पुणे, सातारा, पंढरपूर, नगर, शिरवळ मार्गे भोर महाड , खंडाळा, अशा चहूकडे जाणारी वाहने लोणंद मार्गे जात असतात. त्यातच लोणंदच्या एमआयडीसीमुळे जड वाहनांची गर्दी वाढायला लागली आहे. यातच भर म्हणून रस्त्यावर उभी असणारी वाहने आणि दुतर्फा झालेले फेरीवाल्यांचे अतिक्रमण वाहतूक कोंडीत भर घालत असतात.
लोणंदच्या बसस्थानक परिसरात बसस्थानकातून येजा करणाऱ्या बस आणि एमआयडीसी कडे जाणारी अवजड वाहने यांच्यामुळे शिरवळ चौकात वाहतूक व्यवस्था नियंत्रण करण्यासाठी दोन पोलिस तैनात असूनही वाहतूक कोंडी होतच असते. अहिल्यादेवी चौक ते गोटेमाळ रस्त्यावर नेहमीच होणारी वाहतूक कोंडी लोणंदकरांची डोकेदुखी ठरत आहे. यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची अपेक्षा सामान्य नागरिकांना नगरपंचायतीच्या कडून आहे.
सम विषम पार्किंग व्यवस्था आवश्यक
लोणंदमधे सम विषम पार्किंग व्यवस्था लवकरात लवकर लागू करणे आवश्यक आहे. तसेच लोणंदच्या व्यापारी पेठांमधे रस्ता लहान असताना सुद्धा अनेक व्यापारी आपली वाहने रस्त्यावरच पार्क करून या समस्येत भर टाकत असतात. यामुळे रविवार तसेच बाजाराच्या दिवशी तर नेहमीपेक्षा जास्त अडचण निर्माण होत असते. अशा रस्त्यावर गाड्या पार्किंग करणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई करून अशा वाहनांवर कारवाई करने गरजेचे आहे.