शामगाव ग्रामस्थांचा निर्धार; कॉंग्रेस पदधिकाऱ्यांनी साधला आंदोलकांशी संवाद
कराड – शामगावचा पाणी प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित आहे. टेंभू योजना 1996 साली सुरु झाल्यापासून गेल्या 27 वर्षांमध्ये शामगावकरांना हक्काचे पाणी मिळालेले नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी दि. 1 पासून उपोषण सुरू केले आहे. त्यास पाठिंबा देण्यासाठी आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे स्वीय सहाय्यक गजानन आवळकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि कराड उत्तर कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष निवासराव थोरात यांनी उपस्थिती दर्शवली. त्यांनी आंदोलकांशी संवाद साधला. मंत्रालयात सादर करण्यासाठी आंदोलकांच्या मागण्यांचे निवेदन त्यांनी स्वीकारले.
मंत्रालय पातळीवर प्रस्ताव सादर होऊन, शामगावला लवकरात लवकर पाणी मिळावे, अशी मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली. आवळकर म्हणाले, शामगावच्या पाणी प्रश्नाची पूर्ण माहिती घेऊन, हा प्रस्ताव पुणे विभागीय कार्यालयाला देण्यात आला आहे. मुंबईत मंत्रालयात मुख्य सचिव दीपक कपूर यांच्यासोबत चर्चा करून, हा प्रश्न लवकर मार्गी लावण्यासाठी आ. पृथ्वीराज यांच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे.थोरात म्हणाले, शामगाव, सुर्ली, कामथी व पाचुंद या गावांना टेंभू योजनेतून पाणी देण्याचे प्रस्तावित आहे.
यापैकी 600 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले, असून चारही गावांमधील उर्वरित तीन हजार 400 हेक्टर क्षेत्र अजूनही सिंचनाखाली आलेले नाही. त्यासाठी या गावांमधील ग्रामस्थांनी वेळोवेळी मोर्चे व आंदोलने करून शासनाचे लक्ष वेधले होते. शामगाव ग्रामस्थांनी 2019 साली कराडला तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. पाणी प्रश्न भीषण असूनही, शासनाकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसल्याने ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण सुरु केले आहे.
शासनाने आणखी वेळकाढूपणाची भूमिका न घेता शामगाव, कामथी, पाचुंद व सुर्ली या गावांच्या हक्काचे पाणी तात्काळ द्यावे. यावेळी वहागावचे सरपंच संग्राम पवार, तळबीडचे उमेश मोहिते, उंब्रजचे वसंत पाटील, इंद्रजित जाधव, सुरेश पाटील, सुर्लीचे प्रवीण वेताळ, दत्ता वेताळ, सुदेश वेताळ आणि कामथी, सुर्ली, पाचुंदच्या सरपंचांनी उपस्थित राहून आंदोलनास पाठिंबा दिला.