भरतगावच्या नागरिकांसह पालक, विद्यार्थ्यांची पायपीट; जीवही धोक्यात, आंदोलनाचा निर्धार
नागठाणे – सातारा तालुक्यातील भरतगाव येथील सेवारस्त्याने बसथांब्यावर एसटी बस येत नसल्याने ज्येष्ठ नागरिकांसह विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे तासन्तास एसटीची वाट पाहण्याऐवजी पासधारक विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांसह इतर प्रवाशांना महामार्गापर्यंत पायपीट करुन, जीव धोक्यात घालून महामार्गाच्या कडेला उभे रहावे लागत आहे. अशा परिस्थितीत एखादा मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची वाट एस.टी. प्रशासन पाहतयं का? असा प्रश्न प्रवासी नागरीक उपस्थित करत आहेत.
पुणे- बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर सातारा ते कागल दरम्यान सहापदरीकरणाचे काम दुतर्फा सुरू आहे. त्या कामातील कराड ते सातारा जाणाऱ्या महामार्गालगत भरतगाव येथे जाण्यासाठी सेवारस्ता आहे. सध्या सहापदरीकरणातील सातारा बाजूला जाणाऱ्या तिसऱ्या लेनचे खोदकाम, मजबुतीकरण या सेवा रस्त्यालगत सुरू आहे. तसेच सेवा रस्त्याकडेने गॅस पाईपलाईनसाठी खोल खोदाई केल्याने रस्ता बंद होता. त्यामुळे गेले एक ते दीड महिना बसेसना नियमित सेवारस्त्याने खाली जाता येत नव्हते. त्यामुळे बसेस थेट महामार्गानेच जात आहेत.
अशा परिस्थितीत भरतगाववाडी व भरतगाव येथील पासधारक शालेय विद्यार्थी, नागरिकांना सातारा येथे जाण्यासाठी थेट महामार्गावरच यावे लागत आहे. अशावेळी सेवा रस्त्यावरून जवळपास तीस- चाळीस फूट उंचीच्या भराव पुलाच्या दगडी पिंचींगवरून चढून वर यावे लागत असल्याने जेष्ठ नागरिकांना जिकिरीचे होत आहे. अनेकदा दगडांवरून घसरून पडण्याचे प्रसंगही घडले आहेत. त्यातही भरीसभर म्हणजे सध्या ऑक्टोबर महिना सुरू असल्याने महामार्गावर कडक उन्हात बसेसची वाट पहात अनेक प्रवासी उभे असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
यासंदर्भात सातारा आगार प्रमुख आर. एम. शिंदे यांच्याशी फोनवरून अनेकवेळा संपर्क साधला. तसेच इथे उन्हातान्हात ताटकळलेल्या प्रवाशांचे फोटोही त्यांना पाठवले होते. त्यावर त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून गैरसोय दूर करू असे आश्वासन दिले होते.
पण, स्थितीत कोणताही बदल झालेला दिसत नाही. त्यामुळे यावर उपाययोजना करून कराड, पाटण उंब्रज नागठाणे येथून येणाऱ्या बसेस सेवा रस्त्याने भरतगाव येथील बसथांब्यावर न आल्यास आंदोलन करण्याचा इशारा भरतगाववाडी, भरतगाव येथील संबंधितांनी दिला आहे.
“”रुंदीकरणाच्या कामामुळे नेहमीच्या ठिकाणावरून बसेसना खाली येता येत नव्हते. त्यामुळे बसगाड्या थेट महामार्गावरूनच जात आहेत. यावरुन दोन्ही गावांमध्ये नाराजीचा सूर आहे. यावर उपाय म्हणून कराड बाजूकडून येणाऱ्या बसगाड्या बोरगावपासून पुढे आल्यावर महामार्गावरील महाराजा हॉटेलपासूनच सेवा रस्त्याला वळविल्यास सर्वांचीच अडचण दूर होईल. त्यामुळे या पर्यायी मार्गाची पाहणी एस. टी. प्रशासनाने करावी व प्रवाशांची गैरसोय टाळावी.”
– प्रताप शेलार पोलीस पाटील, भरतगाव