पणजी – गोव्यात झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील बॅडमिंटनमध्ये सांघिक गटात महाराष्ट्राच्या पुरुष व महिला संघाने रजतपदक पटकावले. पुरुषांच्या अंतिम सामन्यात कर्नाटकने महाराष्ट्राचा 3-1 असा पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. तर महिला गटाच्या अंतिम सामन्यात आसामने महाराष्ट्राला 3-0 असे पराभूत केले.
पुरुष गटातील अंतिम लढतीत कर्नाटकच्या एस. भार्गव याने महाराष्ट्राच्या हर्षील दाणी याला 18-21, 21-19, 21-15 असे पराभूत केले व कर्नाटकला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या एकेरीत महाराष्ट्राच्या रोहन गुरबानी याने पृथ्वी रॉय याच्यावर अवघ्या 48 मिनिटांत 23-21, 22-24, 21-14 अशी मात केली व महाराष्ट्राला 1-1 अशी बरोबरी मिळवून दिली.
दुहेरीत कर्नाटकच्या एच. व्ही. नितीन व के. साईप्रतीक जोडीने महाराष्ट्राच्या दीप रंभिया व अक्षण शेट्टी जोडीचा 21-12, 21-14 असा पराभव केला व कर्नाटकची आघाडी 2-1 अशी वाढवली. अंतिम लढतीतील तिसऱ्या एकेरीत आयुष शेट्टी याने दर्शन पुजारी याला 21-16, 21-17 असे अवघ्या 36 मिनिटांत पराभूत केले.
महिलांच्या अंतिम सामन्यात आसामने महाराष्ट्राचा 3-0 असा पराभव केला. अंतिम लढतीत अश्मिता चलिहा हिने महाराष्ट्राच्या पूर्वा बर्वे हिला 21-16, 21-11 असे अवघ्या 33 मिनिटांत पराभूत करत संघाला आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या एकेरीत ईशारानी बरुआ हिने आलिशा नाईक हिला पहिला गेम गमावल्यानंतरही 9-21, 21-13, 21-18 असे पराभूत केले. 2-0 अशा आघाडीनंतर दुहेरीत आसामच्या ईशारानी व अश्मिता जोडीने सिमरन सिंघी व रितिका ठाकर जोडीवर 21-19, 21-13 असा विजय मिळवताना सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले.