सातारा – मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ सातारा जिल्हा मराठा क्रांती मोर्चच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे. या आंदोलनात “एक दिवस समाजासाठी’ हे अभियान राबवण्यात येत असून, त्याला शहर, उपनगर आणि तालुक्यातील हजारो ग्रामस्थांनी पाठिंबा दिला. “जय जिजाऊ, “जय शिवराय’, “एक मराठा लाख मराठा’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
मराठा समाजाला आरक्षण मिळवा यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी आंतरवाली सराटी (जि. जालना) येथे दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन सुरू केले आहे. सातारा जिल्ह्यातही मराठा समाज आक्रमक झाला असून, आंदोलने सुरू आहेत. गावागावांमध्ये सर्वपक्षीय राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात येत असून, तसे फ्लेक्स झळकले आहेत. काहींनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सातारा जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे. या आंदोलनात बाइक रॅली, पदयात्रा काढण्यात आली. त्यानंतर शनिवारी सातारा शहर, उपनगर व तालुक्यातील विविध गावांनी साखळी उपोषणास पाठिंबा दिला.
मराठा समाजातील नागरिकांनी भगव्या टोप्या परिधान करत “एक मराठा लाख मराठा’, “छत्रपती शिवाजी महाराज की जय’, “जय भवानी जय शिवाजी’, “तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय’, अशी घोषणाबाजी केली. आंदोलकांनी आरक्षणाबाबत मते व्यक्त केली. मराठा लोकांकडे मोठी शेतजमीन असल्याचे सांगून, अनेक जण दिशाभूल करत आहेत. मात्र, पूर्वीच्या काळात दोनशे एकर असणारी जमीन आता दोन गुंठ्यांवर आली आहे. मराठा समाजाची आर्थिक स्थिती बिकट आहे. होतकरू आणि गुणवंत मराठा मुलांना संधी मिळत नसल्याने त्यांची कुचंबणा होत आहे. आता तरी आरक्षणाचा लाभ मिळावा, अन्यथा उद्रेक होईल, असा इशारा देण्यात आला.