सातारा – येथील राजवाडा परिसरातील शासकीय सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांचा प्रचंड तुटवडा आहे. त्यामुळे कार्यालयाकडून होणाऱ्या पक्षकारांच्या सुनावणी तांत्रिक कारणास्तव वारंवार लांबीवर पडत आहे.येथील उपलब्ध कर्मचारी संख्येने निम्मेच असल्यामुळे मनुष्यबळाचा हा अनुशेष तात्काळ भरला जावा अशी वकील वर्गातून मागणी आहे.
यासंदर्भात माहिती अशी, सार्वजनिक न्यास नोंदणी करण्यात एकूण 31 कर्मचारी संख्या मंजूर आहे . प्रत्यक्षात मात्र या कार्यालयात सोळाच कर्मचारी सक्रिय असून 15 कर्मचारी अद्यापही भरले गेलेले नाहीत. या कार्यालयाचे अधिकार क्षेत्र संपूर्ण सातारा जिल्हा आहे. जिल्ह्यात सुमारे 23 हजार सार्वजनिक न्यासनोंदणी कार्यक्षेत्र आहे आणि या कार्यालयाची जबाबदारी केवळ 15 कर्मचाऱ्यांवर आहे. त्यामुळे एका न्यासाच्या कागदपत्रांची पूर्तता, पक्षकारांना तारीख देणे, सुनावणी घेणे, तसेच त्याविषयीचे कागदपत्र तयार करणे असा कामाचा प्रचंड व्याप असताना येथील मनुष्यबळाचा अनुशेष अजूनही पूर्ण केला जात नाही.
येथील सार्वजनिक न्यास संस्था यांचे विश्वस्त कार्यकारी मंडळ व वकील वर्ग यांची फार मोठी गैरसोय होत आहे. त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. येथील रिक्त पदे तातडीने भरली जावीत, अशी मागणी शाहूनगर येथील वकील सचिन तिरोडकर यांनी केली आहे. या संदर्भात ठोस कार्यवाही न झाल्यास या विषयावर तीव्र आंदोलन केल्या जाईल, असा इशारा तिरोडकर यांनी निवेदनाच्या माध्यमातून दिला आहे.
येथील कर्मचारी भरती प्रक्रिया धर्मादाय आयुक्त विभाग पुणे यांच्या माध्यमातून केली जाते. यासंदर्भातील संपूर्ण प्रक्रिया ही मंत्रालयातून राबवली जाते. मात्र सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या कर्मचारी भरतीचा प्रश्न अद्यापही प्रलंबित ठेवला जात आहे याविषयी तात्काळ पावले उचलली जावीत, अशी मागणी वकिलांच्या वर्तुळातून होत आहे.