दहिवडीत विराट सभा, सरकारला इशारा तर बांधवांनाही सल्ला
दहिवडी – समाज बांधवांनो 15 दिवस उपोषण केल्यामुळे माझी तब्येत खालवली आहे. परंतु माझ्या समाज बांधवांसाठी जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत लढा देणार आहे. त्यात मरण आले तरी चालेल पण आरक्षण घेणारच असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. दरम्यान, सत्ताधाऱ्यांनो तुमच्यात जे मस्तीचं रक्त आहे, तेच आमच्यातही आहे, अशा कडक शब्दातील इशारा देतानाच श्री. जरांगे यांनी समाज बांधवांना मात्र शांततेचा सल्ला दिला. दहिवडी येथे शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या विराट सभेत जरांगे पाटील यांनी सरकारवर सडकून टीका केली.
जरांगे म्हणाले, मायबाप मराठ्यांनो आता आरक्षण मिळेपर्यंत हा लढा थांबवणार नाही. लोकशाही मार्गाने चाललेले आमचे आंदोलन पोलीस बळाचा वापर करून चिरडले. बाळ मांडीवर झोपलेले असताना त्या मातेचे डोके फोडले. त्यावेळी बाळाच्या अंगावर रक्त सांडत होते. आमच्या वडीलधाऱ्या मायबापांच्या अंगावर काट्या फोडल्या. त्यात अनेकजण कायमचे जखमी झाले आहेत. तरीदेखील आतापर्यंत या सरकारने कोणताही निर्णय घेतलेला नाही. इतके निर्दयी सरकार आतापर्यंत कधी पहिले नाही. मराठ्यांना आरक्षण द्यायचे म्हटले की, समिती लागते, आयोग लागतो. हा कोणता दुजाभाव. मंडल आयोग 1988 मध्ये स्थापन केले आणि 1990 मध्ये ओबीसीला आरक्षण दिले. तेव्हाही आमच्यावर अन्याय केला.
एका रात्रीत आरक्षण वाटले, तरीदेखील आम्ही शांत. परंतू आता आम्ही शांत बसणार नाही. आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. पुढे कोणीही आडवा आला तर सोडणार नाही. आरक्षण घेताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावायचा नाही. आम्हाला कोणाचे आरक्षण कमी करून घ्यायचे नाही. आम्हाला आमच्या हक्काचे आरक्षण पाहिजे. कारण ग्रामीण भागातील ओबीसी समाजही म्हणतोय, मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे. सरकार ओबीसी आणि मराठा समाजात भांडण लावायचे काम करतंय. परंतू आम्ही भाऊ भाऊ आहे, भांडण करणार नाही.
आम्ही कोणत्या पक्षाचे नाही. आम्ही जातीशी प्रामाणिक आहोत. आम्हाला जो आरक्षण देईल, तो आमचा पक्ष. 24 तारखेपर्यंत आरक्षण नाही मिळाले तर या सरकारला शांत बसू देणार नाही. आंदोलन करताना शांततेच्या मार्गाने करायचे आहे. कारण हे सरकार कोणाला शांततेत आंदोलन करू देत नाही हे आपण सगळयांनी पाहिले आहे. आरक्षणासाठी कोणीही आत्महत्या करायची नाही. तुम्ही मेलात तर आरक्षण कोणासाठी घेणार? जाळपोळ, दगडफेक, गाड्या फोडू नका. शांततेत आंदोलन करा. दि. 22 तारखेला आंदोलनाची दिशा ठरेल.
विलंबानंतरही उत्साह कायम
जय भवानी, जय शिवाजी…, एक मराठा, लाख मराठा… अशा घोषणांनी दुमदूमून गेलेल्या दहिवडी परिसरातील सभेत माता भगिनींही हजारोंच्या संख्येने लावलेली उपस्थिती लक्षणीय ठरली. रात्री सव्वा आठला सुरु होणाऱ्या सभेला रात्री 11 वाजूनही प्रारंभ झाला नव्हता. पण, तरीदेखील हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या मराठा युवक, माता, भगिनी आणि बालकांनी आपली जागा सोडली नाही, हे या सभेचे वैशिष्ट्य ठरले. आता ही लढाई थांबणार नाही आणि आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही, असा निर्धारच यानिमित्त दिसून आला.