“एफआरपी’, थकीत बिलांविषयी भूमिका जाहीर करण्याची मागणी
सातारा – यंदाचा गळीत हंगाम सुरू होत असून अद्याप अनेक कारखान्यांनी एकरकमी एफआरपी देण्याबाबत भूमिका स्पष्ट केलेली नाही. अद्याप किसनवीर, शरयू व जरंडेश्वर कारखान्यांनी मागील हंगामातील संपूर्ण रक्कम अदा केलेली नाही.
जोपर्यंत मागील हंगामातील थकीत रक्कम अदा केली जाणार नाही व येत्या हंगामातील एक रक्कमी एफआरपी देण्याबाबत भूमिका स्पष्ट केली जाणार नाही, तोपर्यंत कारखाने सुरू करू देणार नाही, असा इशारा रयत क्रांती संघटनेचे युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी दिला आहे.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शेतकऱ्यांना गृहीत धरून कारखानदारांनी यंदाचा गळीत हंगाम सुरू करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, अद्याप कायद्यानुसार 14 दिवसाच्या आत एकरक्कमी एफआरपी देण्याबाबत कारखान्यांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही. ही बाब अन्यायकारक असून शेतकरी अडचणीत येत आहेत. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील कारखानदार अन् साखर आयुक्त यांनी एकरक्कमी एफआरपी देण्याबाबत भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे.
अद्याप मागील वर्षीच्या गळीत हंगामात घालण्यात आलेल्या उसाची एफआरपीप्रमाणे पेमेंट किसनवीर, शरयू व जरंडेश्वर कारखान्यांनी अदा केलेले नाही. ते पेमेंट जोपर्यंत अदा केले जाणार नाही आणि यंदाच्या गळीत हंगामातील एकरक्कमी एफआरपी देण्याबाबत कारखानदार भूमिका स्पष्ट करणार नाहीत तोपर्यंत कारखान्यांचे धुराडे पेटू देणार नाही, असा इशारा साबळे यांनी दिला आहे.