बारामती – तीस वर्षांपूर्वी जानाई उपसा सिंचन योजना कार्यान्वित होऊनदेखील आजही तालुक्यातील जुराईतपट्ट्यातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे. त्यामुळे शेतकरी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष पोपट खैरे, भानुदास बोरकर, सचिन साळुंखे या शेतकऱ्यांनी आक्रमक होत २६ जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू केले आहे. लोकप्रतिनिधींच्या भूलथापांना बळी पडणार नाही, असा पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतला आहे. जनाई उपसा सिंचन योजनेवर अवलंबून असलेल्या ३५ गावांनी या उपोषणास पाठिंबा दिला आहे. तसेच, राजकीय मंडळींनी उपोषणस्थळी हजेरी लावली.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील आठवड्यामध्ये सुपे येथे बैठकीचे आयोजन केले होते. मात्र, शेतकऱ्यांची समाधान होईल असा मार्ग निघाला नाही. त्यानंतर शेतकऱ्यांनी २६ जानेवारीपासून आमरण उपोषण सुरू केले. उपमुख्मयंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा शेतकरी संघर्ष कृती समितीच्या कार्यकर्त्यांची भेट घेऊन याबाबत ३० तारखेला अधिकाऱ्यांची बैठक लावतो असे सांगितले. त्यामुळे बारा मागण्यांवरती तोडगा निघण्याची शक्यता आहे. आज (मंगळवार, दि. ३०) अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करत हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे उपोषणकर्त्यांनी केलेल्या बारा मागण्या मान्य होणार की नाही याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
उपोषणकर्त्यांची भेट घेतली
उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप, माजी मंत्री विजय शिवतारे, भाजपाचे पुणे जिल्हा अध्यक्ष वासुदेव काळे, भाजपाचे बारामती विधानसभा प्रमुख रंजन तावरे, सामाजिक कार्यकर्त्या प्रियदर्शनी कोकरे, युवराज तावरे आदींनी उपोषणस्थळी जाऊन उपोषणकर्त्यांची भेट घेतली.
सुप्रिया सुळे यांना सुनावले खडे बोल
पाणी देतो म्हणता आणि पाणी देत नाही, निवडणुका आल्या की इथे येता. अजून किती दिवस आम्हाला फसवणार आहात, तुम्हाला एकदा फसवलं, तर कसं होईल, असे खडे बोल उपोषणात सहभागी झालेल्या आजींनी खासदार सुप्रिया सुळे यांना सुनावले. उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी खासदार सुळे गेल्या होत्या.
“तीस वर्षांपूर्वी जनाई उपसा सिंचन योजना कार्यान्वित झाली. मात्र त्याचा फायदा शेतकऱ्यांना कधी झाला नाही. त्यामुळे शेतीच्या पाण्यासाठी जयंतपट्ट्यातील शेतकऱ्यांना नेहमीच वंचित राहावे लागले आहे. शेतकऱ्यांना पाणी मिळावे, यासाठी हा लढा सुरू केला आहे. गेली दोन महिन्यांपासून शासन स्तरावर याबाबत पाठपुरावा केला जात आहे. मात्र कोणतीही दखल घेतली जात नाही. त्यामुळे (२६) जानेवारी पासून अमरण उपोषण सुरू केले आहे. शासन स्तरावर याबाबत हालचाली सुरू असल्याचे समजते मात्र जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील.-” पोपट खैरे, उपोषणकर्ते, अध्यक्ष शेतकरी संघर्ष कृती समिती