फलटण – फलटण तालुक्यात आतापासूनच दुष्काळाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील दुष्काळी तालुक्यांमध्ये फलटण तालुक्याचा समावेश करण्याची घोषणा राज्य सरकारने केलेली असली तरी फलटण तालुक्यातील 9 गावात टॅंकरने तर 2 गावांत विहीर, बोअर अधिग्रहण करुन पाणीपुरवठा सुरु आहे. पाण्याअभावी आगामी काळातील संभाव्य भयावह स्थिती लक्षात घेता नुसत्या कल्पनेनेच शेतकऱ्यांचे चेहरे करपू लागलेले आहेत.
कमी झालेला पाऊस, धरणातील अपुरा पाणीसाठा, भूजल पातळीत झालेली घट यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याची टंचाई फलटण तालुक्यात भेडसावत आहे. आगामी मान्सूनच्या आगमनाला अजून अंदाजे पुढील आठ महिने बाकी आहेत.
सर्वत्रच पीक आणि पाणी याची परिस्थिती चिंताजनक आहे. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीतील निर्णयानुसार नीरा उजवा कालव्यासाठी यावर्षी जवळपास 3.5 टीएमसी पाणी कपातीची परिस्थिती दीर्घकालीन राहणार असल्याचे संकेत असून शिवाय जसजसा पाणीसाठा कमी होईल तसतशी ही कपात आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. फलटण शहरामध्ये पालिकेकडून सध्या 30 टक्के कपात सुरु असून येत्या काळात कपातीचे प्रमाण 50 टक्के होऊन एक दिवसाआड पाणीपुरवठाही होऊ शकतो. तालुक्यातील 126 गावांपैकी 53 गावांत पाणीटंचाई घोषित करण्यात आली आहे. 9 गावांत आतापासूनच टॅंकरने तर 2 गावांत विहीर, बोअर अधिग्रहण करुन पाणीपुरवठा सुरु आहे. पाण्याअभावी तलाव, बंधारे कोरडे पडले असून शेती व जनावरांसाठी पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे.
तालुक्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. खरीपाच्या पेरण्या वाया गेल्या तर रब्बीच्या पेरण्या झाल्या नाहीत. तालुक्यातील पन्नासपेक्षा जास्त गावे टंचाईग्रस्त आहेत. पाण्याअभावी शेती, दुग्ध व्यवसाय अडचणीत आले आहेत. पाण्याअभावी ऊस, ज्वारी, कांदा व अन्य पिके जळून चालली आहेत. जनावरांसाठी आवश्यक पाणी उपलब्ध नसल्याने दूध उत्पादक शेतकरी संकटात आहे.
तालुक्यात पावसाची वार्षिक सरासरी 350/400 मिलिमीटर इतकी अत्यल्प आहे. 2021 मध्ये सप्टेंबरअखेर 68 टक्के, 2022 मध्ये सप्टेंबरअखेर 136 टक्के आणि 2023 मध्ये सप्टेंबरअखेर 49 टक्के पाऊस पडला आहे.
येथील शेती, लोकवस्ती व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था कालव्याच्या पाण्यावर अवलंबून आहे. नेहमी भाटघर, वीर, नीरा- देवघर, गुंजवणी, धोम- बलकवडी ही धरणे पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर पाणी सोडण्यात येते. त्यामुळे ओढे, नालेही भरून वाहतात. परंतु, यंदा हे जादाचे पाणी न वाहिल्याने नदी, नाले, ओढे वाहिले नाहीत. परिणामी तालुक्यातील विहिरी कोरड्या आहेत तर या नदी, नाले, ओढ्यावरील पाझर तलाव, ग्रामतलाव, पाटबंधारे तलाव, बंधारे अद्याप रिकामे आहेत.
चारा व पिण्याच्या पाण्याची स्थिती गंभीर झाली असून ती आणखी गंभीर होण्याची शक्यता असल्याने शेतकरी आणि सर्वसामान्य माणूस धास्तावला आहे. शेतीला जोडधंदा म्हणून या तालुक्यात दुग्ध व्यवसाय मोठा प्रमाणात वाढला असल्याने दुभत्या जनावरांना आवश्यक असलेला चारा डिसेंबरपर्यंत पुरेल. त्यानंतर चाऱ्याची समस्या निर्माण होण्याचे चित्र आहे. त्यामुळे तालुक्यातील महसुली आणि विविध बॅंका तसेच सहकारी सोसायट्यांकडील पीक कर्जाची वसुली थांबविणे, पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था, शासकीय रास्त भाव दुकानात पुरेशा प्रमाणात अन्नधान्याचा साठा उपलब्ध करून देणे, शालेय विद्यार्थ्यांची फी माफी आणि विद्यार्थ्याच्या समस्या तातडीने दूर करणे यांसह दुष्काळी परिस्थितीत शासनाने सर्व सुविधा त्वरीत पुरवाव्यात व दिलासा द्यावा, अशी मागणी जनतेतून व्यक्त होत आहे.
पाण्याची गळती थांबवावी…
फलटण तालुक्यात प्रशासनाने पाणी साठवण तलावासह टाक्यांच्या गळतीकडे लक्ष दिले पाहिजे. शहराच्या पाणीपुरवठ्याच्यादृष्टीने महत्त्वाचा असणारा पाणी साठवण तलाव, शहरातील तसेच ग्रामीण भागातील पाण्याच्या टाक्या, पाइपलाइन, तलाव, धरणे यांमधून गळतीमुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून जात असते. याकडे संबंधित प्रशासनाने आता तरी प्राधान्याने लक्ष देऊन गळती थांबवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे. नागरिकांकडूनही आपल्या खासगी मालकीचे नळ, पाईप, टाक्या यामधून पाणी वाया जात असल्यास ते तात्काळ थांबवणे आवश्यक आहे.