कराड – आपल्याकडे दुग्ध व्यवसायाकडे पारंपरिक उद्योग म्हणून आजही पाहिले जाते. या व्यवसायातून दुधाव्यतिरिक्त खत, निरोगी कालवडींचे संगोपन, कुक्कुटपालन, ओला चारा निर्मिती, मुरघास आदींच्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळवता येते. त्यामुळे शेतकर्यांनी या व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे, असे मत फलटण येथील संजीवराजे नाईक-निंबाळकर गोविंद डेअरीचे संचालक डॉ. शांताराम गायकवाड यांनी व्यक्त केले.
कृष्णा कृषी परिषदेतर्फे आयोजित कृष्णा कृषी व औद्योगिक महोत्सवातील कृषी चर्चासत्रात ‘दुग्ध व्यवसायातील नवीन संधी’ या विषयावर ते बोलत होते. ते म्हणाले, आपल्याकडील लोक पंजाब, हरियाणा, कर्नाटक इत्यादी राज्यांमधून गायी व म्हशी विकत आणतात. त्या ठिकाणी ही जनावरे चांगले दुध देतात; पण आपल्याकडे आणल्यावर बर्याच वेळा तक्रारी वाढतात. त्यापेक्षा आपल्या तरुणांनी चांगल्या प्रकारे वासरांचे संगोपन केल्यास, त्यांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होऊ शकतात. व्यवसायात भांडवल, कमी खर्चात जास्त उत्पादन, मजूर पुरवठा, जनावरांची चांगली वंशावळ, बाजारपेठ आणि जनावरांच्या रोगांचा प्रतिबंध या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जनावरांना चांगला चारा दिल्यास खाद्याचा खर्च 50 टक्क्यांपेक्षा कमी करता येतो. व्यावसायिक दृष्टीने दुग्ध व्यवसाय व चारा व्यवस्थापन केले पाहिजे. तंत्रज्ञानाच्या वापराने दुग्ध व्यवसाय उत्कृष्ट पद्धतीने करता येऊ शकतो.
दुसर्या सत्रात ‘तृणधान्य प्रक्रिया उद्योग’ या विषयावर सौ. उमा मांगले यांनी मार्गदर्शन केले. त्याम्हणाल्या, तृणधान्ये आहारात अत्यंत महत्त्वाची आहेत. आपल्याकडे ज्वारी, बाजरी, नाचणी, राळा, भगर आदींचे उत्पादन घेतले जाते. नाचणी उद्योगात मोठी आर्थिक उलाढाल होते. नाचणी सत्वाकडे फक्त लहान मुलांचा पोषक आहार म्हणून पहिले जाते. मात्र, नाचणी सर्व वयोगटासाठी फायदेशीर असून, त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती व हिमोग्लोबिन वाढते. महिला बचत गटांच्या माध्यमातून नाचणीची विविध उत्पादने बनवली जात असून, त्यांना बाजारपेठही मिळत आहे. महिला, युवती आणि तरुणांनी अशा प्रकारच्या उद्योगांकडे वळायला हवे.