सातारा – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी घटनात्मक पदाचा दर्जा घालवण्याचे काम सुरु केले आहे. महाराष्ट्राला नेहमी कमी लेखून राज्याचा अवमान करण्याचे काम त्यांच्याकडून होत आहे. पक्षपातीपणाबद्दल ते आधीपासून चर्चेत असताना आता महाराष्ट्र राज्याविरोधात त्यांची वक्तव्ये येत असून सोमवारी सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यपालांविरोधात आक्रमक भूमिका राष्ट्रवादी कार्यालयासमोर जोरदार निषेध नोंदवला. राष्ट्रपतींनी राज्यपालांची उचलबांगडी करुन घटनात्मक पदाचा सन्मान करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईबाबत केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटत आहेत. यापूर्वीही त्यांनी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीची वक्तव्ये केली होती. घटनात्मक पद असतानाही एखाद्या पक्षाचा पदाधिकारी असल्याचे त्यांचे वर्तन असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून नेहमीच होत आला आहे. या वक्तव्यांचा निषेध करत सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत राज्यपालांची हकालपट्टी करण्याची मागणी केली.
आ. शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात जिल्हाध्यक्ष सुनील माने, ज्येष्ठ नेते बाळासाहेब सोळसकर, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील आदी सहभागी झाले होते. जो महाराष्ट्रा से टकरायेगा वह मिट्टीमे मिलजाएगा, महाराष्ट्राच्या मराठी बांधवांचा अवमान करणार्या राज्यपालांचा धिक्कार असो, नही चलेगी नहेगी चलेगी दादागिरी नही चलेगी आदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
आ. शिंदे म्हणाले, ‘राज्यपाल हे मोठे पद, या पदाची गरिमा आहे. गेल्या काही वर्षांपासून राज्यपाल एखाद्या पक्षाची भूमिका मांडत आहेत. माणूस एकदा चुकतो, दोनदा चुकतो मात्र सातत्याने जाणीवपूर्वक त्यांच्याकडून अशी वक्तव्ये होत आहेत. चुकायचे आणि माफी मागण्याचा साधा लवलेशही नाही. याबाबत आता अनेक पक्ष एकवटत असून राज्यपालांना होत असलेला वाढता विरोध पाहता राज्यपालांनी त्यांना विश्रांती द्यावी, अशी मागणी शिंदे यांनी केली.
यावेळी युवक प्रदेश उपाध्यक्ष गोरखनाथ नलवडे, अतुल शिंदे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष समिंद्रा जाधव, महिला आघाडी पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस संगीता साळुंखे, राष्ट्रवादी युवती काँग्रेस प्रदेश सचिव स्मिता देशमुख, युवती जिल्हाध्यक्ष पूजा काळे, शशिकांत वाईकर, अल्पसंख्याक सेलचे जिल्हाध्यक्ष शफिक शेख, भटक्या विमुक्त सेलचे जिल्हाध्यक्ष अशोकराव जाधव, ज्येष्ठ नागरिक सेल जिल्हाध्यक्ष मोहनराव जाधव, पुनम नलावडे, वनिता नलावडे, गिरीश फडतरे, प्रशांत कुरळे, वैभव मोरे, सचिन जाधव, गणेश ताटे, विनायक बर्गे, संभाजी ताटे, स्वप्निल वाघमारे, संतोष पवार, समाधान कदम, विशाल शिर्के, मंगेश गायकवाड, ताजुद्दीन मुल्ला, सचिन जाधव, सागर पवार, सिकंदर डांगे आदी उपस्थित होते.