राहुरी – तालुक्यातील मानोरी येथील अँड.आढाव दाम्पत्यांच्या हत्येच्या निषेधार्थ व राज्यात वकील संरक्षण कायदा लागू करण्यात यावा, या मागणीसाठी जिल्ह्यातील सर्व तालुका वकील संघटनांनी न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकला असून] आता 9 फेब्रुवारीपर्यंत हा बहिष्कार राहणार आहे.अनेक राजकीय नेत्यांनी आंदोलनार्थी वकिलांची भेट घेतली.
दि.९ फेब्रुवारीपर्यंत तालुका न्यायालय आवारात साखळी उपोषण वकील करीत आहेत. जिल्हयातील सर्व तालुक्यांच्या वकील संघटनांनी हा निर्णय घेतला आहे. वकील संरक्षण कायदा लागू करावा, या मागणीसाठी मुंबईला वकिलांचा मोर्चा नेला होता.राहुरी न्यायालय आवारात साखळी उपोषण चालू असून माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, माजी आमदार प्रसाद तनपुरे व शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख रावसाहेब खेवरे यांनी आंदोलक वकिलांची भेट घेतली.
आ. थोरात म्हणाले,वकील दांम्पत्यांची हत्या ही घटना दुर्दैवी असून वकील संरक्षण कायदा शासनाने लवकरात लवकर मंजूर केला पाहिजे कर्डिले म्हणाले की, गुन्हेगारांना तातडीने अटक झाली आहे. मात्र, संबंधित गुन्हेगारांना कडक शिक्षा होईल, या पध्दतीने आरोपपत्र पुराव्यासह केस मजबूत करण्याच्या सूचना आपण पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी वकील संघटनेच्या मागणीकडे आपण लक्ष वेधू. माजी आमदार प्रसाद तनपुरे यांनीही शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे समवेत आंदोलन वकिलांची भेट घेतली. घडलेली हत्या दुर्दैवी आहे. या घटनेमागील सर्व गोष्टी समोर आल्या पाहिजेत. गुन्हेगाराची पाळेमुळे पोलिसांनी शोधून काढली पाहिजेत. ज्येष्ठ वकील अँड. रावसाहेब करपे , भाऊसाहेब धर्माजी पवार,अँड. मच्छिंद्र देशमुख, अँड. संदीप खपके आदी वकील यावेळी हजर होते.