मोहित देवधर
खंडाळा – स्वच्छ सर्वेक्षणच्या नावाखाली खंडाळा नगरपंचायततर्फे सार्वजनिक शौचालयबाबत भोंगळ कारभार चालला आहे. खंडाळा शहरामध्ये ठिकठिकाणी सार्वजनिक शौचालये उभारण्यात आली आहेत. मात्र, बाहेरून रंगरंगोटी मात्र आतमधील शौचालयांपैकी निम्मी शौचालये अनेक ठिकाणी कित्येक महिन्यांपासून तुंबल्याने वापरायोग्य राहिलेली नाहीत, अशी तक्रार नागरिकांमधून होत असून असल्या गलथान कारभारामुळे निषेध होत आहे. नगरपंचायत स्वच्छता विभागाकडून शौचालयांच्या स्वच्छतेबाबत लवकरच निर्णय न घेतल्यास नगरपंचायत प्रशासनाला जागे करण्यासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा रिपाइं (आठवले गट) तालुकाध्यक्ष अजित गायकवाड यांनी दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, नगरपंचायतकडून दिलेल्या लाखो रुपयांच्या टेंडरमध्ये या सार्वजनिक शौचालयाच्या देखभाल दुरुस्तीचेही काम आहे. मात्र संबंधित टेंडर मालकाकडून सार्वजनिक शौचालयांची खरोखर देखभाल दुरुस्ती होते का याकडे लक्ष देण्याची गरज स्वच्छता विभागाला गरज आहे, फक्त दिखावा करत खंडाळा नगरपंचायतने सार्वजनिक शौचालयाला स्वच्छ सर्वेक्षणच्या नावाखाली अतिशय सुंदर रंगरंगोटी केली पन प्रत्यक्षात या शौचालयाची अंतर्गत अवस्था पाहता दुरून डोंगर साजरे असं म्हणण्याची वेळ खंडाळकरांवर आली आहे. यात बाहेरून रंगरंगोटी मात्र आतमधील शौचालयांपैकी जवळपास निम्मी शौचालये अनेक ठिकाणी कित्येक महिन्यांपासून तुंबल्याने वापरायोग्य राहिलेली नाहीत.
यामध्ये शहरातील गरजेच्या असणार्या तीन ठिकाणावर मिळून एकूण 13 शौचालय मात्र यापैकी सात शौचालय अनेक महिन्यांपासून बंद स्थितीत आहेत, म्हणजे जवळपास 50 टक्क्यांपेक्षा जास्त शौचालये बंद आहेत मग हा रंगरंगोटीचा दिखावा कशासाठी, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून येत आहे. देखभाल दुरुस्ती केली तर नक्कीच नागरिकांचा होणारा त्रास कमी होणार आहे मात्र खंडाळा नगरपंचायतचे कंत्राटदारांच्या कामांकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे.
स्वच्छतेबाबत तातडीने निर्णय घ्या
नगरपंचायतकडून नेमलेला स्वच्छतादूत नक्की काय काम करत आहे, स्वच्छ सर्वेक्षणबाबतीत सर्वच प्रकारात असलेल्या अस्वच्छतेकडे या स्वच्छतादूताचे लक्ष का जात नाही ? खंडाळा शहरांमध्ये सद्यस्थितीत स्वच्छ सर्वेक्षणचे चाललेले काम अतिशय गलथान असून प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का काय अशी शंका येते. मागच्या आठवड्यात कचरा डेपोची अवस्था समोर आली आहेच, कचरा डेपोची दुरावस्था अत्यंत बिकट असून त्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे.
-तात्यासाहेब नरुटे पाटील, सामाजिक कार्यकर्ते