पुसेसावळी – कोरेगाव,खटाव,कराड,सातारा या तालुक्यामधील 10 गावांमध्ये असलेल्या तांडा वस्त्यांना एकूण 93 लक्ष रुपयांचा विकासनिधी मंजूर केल्याची माहिती सातारा भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशिल कदम यांनी दिली.
महाराष्ट्र राज्यात विमुक्त जाती,भटक्या जमाती प्रवर्गात अनेक जाती-जमाती असून या जात समूहांमधील लोक अद्याप भटकंती करून स्थलांतरित स्वरूपाचे जीवन जगत आहेत यामध्ये प्रामुख्याने लमाण,बंजारा,वंजारी,धनगर पारधी, रामोशी अशा अनेक जात समूहाचे तांडे अथवा वस्त्या असून अशा तांड्यामध्ये या जाती जमातीचे लोक अनेक वर्षापासून राहत आहेत मात्र स्थलांतरित असल्याने या वस्त्यांना पुरेशा मूलभूत सुविधा उपलब्ध होत नाहीत त्यामुळे या ठिकाणी राहणाऱ्या लोकांना अनेक अडीअडचणींचा सामना करावा लागत होता.
स्थलांतरित स्वरूपाचे जीवन जगणाऱ्या या जात समूहांच्या अनेक तांडा वस्त्या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघांमध्ये देखील समाविष्ट आहेत या गोष्टीची गांभीर्याने दखल घेऊन या तांडावस्त्यांच्या सुधारणेसाठी भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी सातत्याने इतर मागास बहुजन कल्याण मंत्री ना.अतुल सावे यांचेकडे पाठपुरावा करुन मंजूर केला आहे.
वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना अंतर्गत हा विकास निधी मंजूर करण्यात आला असून यामध्ये मोहितेवाडी, ता. कोरेगाव अंतर्गत रस्ता काँक्रिटीकरण करणे व बंदिस्त भूमिगत गटर करणे,गोरेगाव वांगी ता.खटाव रामोशी वस्तीमध्ये समाज मंदिर बांधकाम करणे,पवार वस्ती रस्ता कॉंक्रिटीकरण करणे, कराड तालुक्यातील बेलवडे हवेली धनगर वस्तीत आरसीसी गटर बांधणे, भोई वस्तीत आरसीसी गटर बांधणे, बाबरमाची येथील रामोशी वस्तीमध्ये रस्ता कॉंक्रिटीकरण करणे,
शिरवडे येथील नंदीवाले वस्तीमध्ये रस्ता कॉंक्रिटीकरण करणे व बंदिस्त गटर बांधणे, सुर्ली येथील उमाजी नाईक नगर मध्ये रस्ता कॉंक्रिटीकरण करणे,पार्ले येथील रामोशी वस्ती मध्ये सभागृह बांधकाम करणे,तळबीड येथील विठ्ठल रोड ते रामोशी वस्ती रस्ता कॉंक्रिटेकर करणे,सुंदर नगर उत्तर पार्ले बंजारा वस्तीमध्ये बंदिस्त गटर बांधकाम करणे, सासपडे ता.सातारा येथील गोसावीवस्ती मधील मेन रोड ते जाडाराम मोरे यांच्या घरापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण करणे असा या कामांचा समावेश आहे.
विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल सदर गावच्या तांडा वस्तीतील नागरिकांनी भाजप सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, निवडणूक प्रमुख मनोज घोरपडे, भाजपा किसान मोर्चा सरचिटणीस रामकृष्ण वेताळ व भाजपा पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.