अमर मोकाशी
सातारा – छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि मर्द मावळ्यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या सह्याद्रीच्या रांगेतील असंख्य गडकोट दिमाखात उभे आहेत. असाच एक गडकोट म्हणजे किल्ले वासोटा! ट्रेकर्सना खुणावणारा आणि निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्याचा किल्ला म्हणजेच वासोटा. बामणोलीपासून शिवसागर जलाशयातून बोटीने, लॉंचने प्रवास आणि मग किल्ले वासोटा! सध्या पर्यटकांचा ओढा वासोट्याकडे भलताच वाढला आहे;
परंतु निमुळत्या, मुरमाड, खडकाळ, दगडगोट्यांच्या घसरत्या आणि अवघड मार्गामुळे किल्ले वासोटा पर्यटनाला घसरगुंडीचे ग्रहण लागले आहे. किल्ले वासोटा चढताना अनेक लोक घसरून पडून जायबंदी होत आहेत. पर्यटकांच्या सुरक्षिततेची कोणतीही काळजी घेतली जात नसल्याने किल्ले वासोट्याची वाट बिकट आणि जीवघेणी ठरत आहे.
छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित मराठी मालिकेत किल्ले वासोट्याचा उल्लेख झाला आणि ट्रेकर्सप्रमाणेच सामान्य पर्यटकांना वासोटा किल्ल्याने भुरळ पाडली. पुणे, मुंबई, सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथून येणारे हजारो पर्यटक दर आठवड्याला वासोटा सर करत आहेत. तसे पहिले तर किल्ले वासोट्याची वाट खूपच धोकादायक आहे. शिवसागर जलाशयातून बाहेर पडल्यावर दीड-दोन किलोमीटर जंगलातील रस्ता पार केला की, सुरू होते निमुळत्या आणि घसरत्या चढाईला प्रारंभ.
सरळ उभी चढाई असल्याने सामान्यांचे सोडाच, अनेक ट्रेकर्सचीसुद्धा दमछाक होते. वास्तविक हा किल्ला ट्रेकिंगसाठी सर्वोत्तम मानला जातो; पण प्रसिद्धीमुळे लॉकडाऊननंतर वृद्ध व महिला पर्यटकही मोठ्या हौसेने किल्ला पाहण्यासाठी येत आहेत. मात्र, किल्ल्यावर चढताना होणारा धोकादायक, जीवघेणा प्रवास आणि आवश्यक सुविधांची वानवा यामुळे असंख्य पर्यटक “पुन्हा वासोटा नको रे बाबा’ असे म्हणतात, हे वास्तव आहे.
सातारा जिल्ह्यातील कोयनेच्या घनदाट अरण्यात वसलेला वासोटा हा वनदुर्ग. छत्रपती शिवराय पन्हाळगडावर अडकले असताना, आपल्या मुखत्यारीत मावळातील पायदळ पाठवून त्यांनी वासोटा किल्ला दि 6 जून 1660 रोजी घेतला. 1661 मध्ये पकडलेल्या इंग्रज कैद्यांपैकी फॅरन व सॅम्युअल यांना वासोट्यावर कैदेत ठेवण्यात आले होते. 1706 मध्ये पंतप्रतिनिधींच्या उपपत्नी ताई तेलिणीने हा किल्ला आपल्या हातात घेतला. त्यानंतर पेशव्यांचे सेनापती बापू गोखले यांनी ताई तेलिणीबरोबर लढाई केली. ताई तेलिणीने आठ-दहा महिने प्रखर झुंज देत किल्ला लढवला, पण 1730 मध्ये वासोटा किल्ला बापू गोखल्यांच्या हाती पडला.
ऐतिहासिक माहितीनुसार हा किल्ला गुन्हेगार, कैद्यांना ठेवण्यासाठी, कडेलोट करण्यासाठी होता. गडावर मारुतीचे बिनछपराचे मंदिर आहे. मंदिरापासून प्रमुख तीन वाटा जातात. सरळ जाणारी वाट किल्ल्यावरील भग्नावशेषांकडे घेऊन जाते. तेथे झाडीत लपलेले वास्तूचे अवशेष पाहायला मिळतात. पुढे ही वाट कड्यापाशी जाते. तेथून नागेश्वर व कोकणचे दर्शन होते. मारुती मंदिरापाशी येऊन उजव्या बाजूस जाणारी वाट काळकाईच्या ठाण्याकडे जाते. या वाटेवर आधी डाव्या हाताला मोठा तलाव आहे. या तलावातील पाणी पिण्यायोग्य नाही. पुढे गेल्यावर महादेवाचे सुंदर मंदिर व त्या बाजूची वास्तू पाहायला मिळते.
तेथून चिंचोळी वाट माचीवर घेऊन जाते. माचीलाच काळकाईचे ठाणे म्हणतात. पुन्हा मारुतीच्या देवळापाशी आल्यावर डावीकडे जाणाऱ्या वाटेवर चुन्याचा घाणा पडलेला आहे. पुढे गेल्यावर जोड टाकी आहेत. या टाक्यातील पाणी पिण्यासाठी योग्य आहे. पुढे ही वाट जंगलात शिरते अन् बाबू कड्यापाशी पोहोचते. वासोट्यावरुन समोरच एक सुळका लक्ष वेधून घेतो. तो खोटा (छोटा) नागेश्वर, त्यापुढे दूरवर एक सुळका दिसतो, त्यालाच नागेश्वर म्हणतात. या सुळक्याच्या पोटात एक गुहा असून, तेथे महादेवाचे मंदिर आहे.
असा हा निसर्गाची मुक्त उधळण झालेला वासोटा किल्ला कोयना अभयारण्यातील सह्याद्री व्याघ्र राखीव प्रकल्पात येत असल्याने वन विभागाच्या अखत्यारीत आहे. बामणोली, तापोळा हा परिसर शिवसागर जलाशयाने समृद्ध आहे. या भागाला निसर्गाचे वरदान आहे. येथे बोटिंग, पर्यटन व्यवसाय जोमात आहे. किल्ले वासोटा दर्शनामुळे स्थानिकांचे व्यवसाय सुरू आहेत. बोटिंग हे मुख्य साधन असलेल्या भागात आता वासोटा दर्शन हा पर्यटनाचा नवा ट्रेंड सुरू झाला आहे. पर्यटक शनिवार, रविवार व इतर सुट्ट्यांमध्ये गर्दी करतात. आदल्या दिवशी टेंटमध्ये रहा. दुसऱ्या दिवशी सकाळी बोटीने वासोट्याचा पायथा गाठा. वासोटा दर्शन करून बोटीने माघारी फिरा.
त्यात चहा, नाश्ता, रात्रीचे भोजन, दुपारचा डबा असा फंडा राबवला जात आहे. त्यामुळे पर्यटकांची सोय होते आणि स्थानिकांना रोजगारही मिळतो. त्यामुळे पर्यटक उत्साहाने किल्ले वासोट्याकडे प्रयाण करतात; पण किल्ला चढताना आणि उतरताना होणारे हाल पाहून वन विभागाच्या नावाने शिमगा करण्याची वेळ येते. करोनामुळे सर्व तपासण्या केल्यावर वन विभागाच्या ढिसाळ कारभाराचा पाढा सुरू होतो, तो किल्ला उतरल्यानंतरही संपत नाही.
किल्ला चढताना निमुळता, निसरडा रस्ता, दगडमाती यामुळे लहान मुले, महिला व वृद्धांचे हाल होतात. काही जण घसरून पडतात, तर काही जायबंदी होतात. हा प्रवास जीवावर बेतू नये, म्हणून अनेक जण चढाई अर्धवट सोडून माघारी फिरतात. पर्यटकांच्या सुरक्षिततेची दक्षता घेतली गेली नसल्याने वासोटा दर्शन एखाद्याच्या जीवावर बेतू नये, याची काळजी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.