सातारा – सध्या राज्यात कोरोनाच्या रुग्णांमुळे गाजत असलेल्या इस्लामपूर येथील एका कुटुंबांतील तीन सदस्य मायणीत आल्याने परिसरातील नागरिकांची व यंत्रणेची पळापळ झाली. याबाबत अधिक माहिती अशी की, राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढलेला असून सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर यात आघाडीवर आहे. या शहरातील एकाच कुटुंबांत पाच लोकांना कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर कोरोनाच्या भितीने इस्लामपूर येथील एका कुटुंब मायणी (ता.खटाव) येथील त्यांच्या नातेवाईकांकडे दोन दिवसांपूर्वी राहण्यास आले होते.
ही गोष्ट मायणी येथील काही लोकांना कळाल्यानंतर त्या तिघांना प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. ही गोष्ट वार्यासारखी शहरात पसरल्यानंतर सर्वत्र भितीचे वातावरण झाले होते. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी शेखर सिंह, खटावच्या तहसीलदार अर्चना पाटील यांनी संबंधित तिघांना पुढील तपासणीसाठी रुग्णवाहिकेने सांगली येथील जिल्हा रुग्णालयाकडे पाठवण्यात आले. मात्र, त्या तिघांनाही कोरोनाची लक्षणे नाहीत. तरीही त्यांच्या सांगलीत तपासण्या करुन वैद्यकीय अधिकारी पुढील निर्णय घेतील अशी माहिती तहसीलदार पाटील यांनी दिली.