पोलीस, ग्रामपंचायत, लोकप्रतिनिधींनी काढली समजूत ; एकाच वेळी रस्त्यावर आल्याने उडाली खळबळ
वाघोली : मध्यप्रदेश छिंदवाडा येथील मुळगावी जाण्यासाठी एकत्रित पायी निघालेल्या सुमारे १५० कामगारांना वाघोली येथे रोखण्यात आले. सर्व कामगार आव्हाळवाडी, डोमखेल, वाघोली परिसरातील असून लोणीकंद पोलीस, वाघोली ग्रामपंचायत पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व स्वयंसेवी संस्थांनी सर्व कामगारांची समजूत काढून घरपोच धान्य किंवा जेवण पुरविण्याचे आश्वासन देऊन त्यांना पुन्हा घरी पाठविले. सर्व नागरिकांना बाजारतळ मैदानामध्ये फळे, धान्य व जेवण वाटप करण्यात आले.
कोरोनाची भीती, घर खर्चाला पैसे नाहीत, भाडे भरायचे कसे, खाण्यासाठी धान्य शिल्लक नसल्याने आव्हाळवाडी, डोमखेल व वाघोली परिसरातील सुमारे १५० कामगार त्यांच्या मध्यप्रदेश छिंदवाडा येथील मुळगावी पायी निघाले होते. घरातील सामान व कुटुंबासह एकाच वेळी १५० कामगार आव्हाळवाडी रोड येथून पुढे जात असल्याची माहिती प्रशासनाला समजल्यानंतर सर्वांना वाघोली येथील बाजारतळ मैदानामध्ये थांबविण्यात आले. त्यांच्याकडून माहिती घेतली असता, कामगार अड्ड्यावर रोजंदारीने काम करणारे कामगार असल्याचे समजले. सगळ्यांनी पैसे शिल्लक नाही, काम नाही, धान्य नाही अश्या तक्रारी मांडल्या.
वाघोली ग्रामपंचायत, लोणीकंद पोलीस आणि गावातील लोकप्रतिनिधींनी सर्व कामगारांना लॉकडाऊन असल्यामुळे अशा प्रकारे जाता येणार नसल्याचे सांगितले व त्यांना फळे, धान्य व जेवणाचे वाटप करण्यात आले. कामगारांच्या कुटुंबाची नावे ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी नोंदवून घेतली आहेत. शासनाकडून व सामाजिक संस्थेकडून धान्य अथवा जेवण घरपोच देण्याचे आश्वासन देण्यात आले. सर्वांना पुन्हा पोलिसांच्या सोबतीने त्यांच्या घरी पाठविण्यात आले.
घरमालकांनी कामगारांना सहकार्य करावे : पोलीस निरीक्षक प्रताप मानकर
लॉकडाऊन व संचारबंदीमुळे अनेक दिवसांपासून रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांचे मोठे हाल होत आहेत. काम केले तरच निवारा, जेवण मिळेल अशी परिस्थिती अनेक कामगारांची आहे. बहुतांश जणांना घर भाडे भरण्यासाठी देखील पैसे नसल्याने गावाकडे जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे घरमालकांनी एक सामाजिक भान म्हणून कामगारांना सहकार्य करावे असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी केले आहे.