पुसेसावळी – केंद्र सरकारच्यावतीने माता- भगिनींच्या आरोग्यासाठी व माता, बालमृत्यू थांबावेत यासाठी महिला व बालविकास मंत्रालयाच्या माध्यमातून मातृवंदना योजना सुरू करण्यात आली. या योजनेत प्रशासनाची मेहनत व नागरिकांच्या सहभागामुळे सातारा जिल्हा राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांनी दिली.
नरेंद्र मोदा यांच्या नेतृत्वाखाली महिलांच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या योजना राबविण्यात येत आहेत. माता सक्षम असेल तर बालक सक्षम होते. प्रत्येक बालक उद्याचे भविष्य आहे. महिलांच्या उन्नतीसाठी वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत. भाजप सातारा जिल्ह्याच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी व या योजना राबविणारे शासकीय अधिकारी यांचे त्यांनी आभार मानले.
श्री. कदम म्हणाले,””जिल्ह्यातील 1 लाख 18 हजार 827 लाभार्थ्यांनी नोंदणी केली असून 50 कोटी 37 लाख 50 हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत. स्थानिक प्रशासन, महिला व बालविकास विभाग यांच्यामुळे आज सातारा जिल्ह्यातील लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात या योजनेचा फायदा होत आहे.”
ग्रामीण भागातील अनेक महिलांना परिस्थितीमुळे गरोदरपणात किंवा नंतर देखील नवजात अर्भकासह मोलमजुरीच्या कामास जावे लागते. अशा महिला भगिनींना वरदान ठरणारी व नवजात शिशुचे योग्य पालनपोषण व्हावे, स्तनदा मातेला सकस आहार मिळावा, यासाठी ही मातृवंदना योजना खऱ्या अर्थाने वरदान ठरत असल्याचे धैर्यशील कदम यंनी सांगितले. जिल्ह्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.