केंद्रीय पर्यटन मंत्र्यांकडे उदयनराजे भोसले यांची मागणी
सातारा – केंद्र सरकारच्या स्वदेश योजनेत ‘बुद्ध सर्किट’, ‘रामायण सर्किट’ पर्यटकांसाठी विकसित केली जात आहेत. याच धर्तीवर ‘शिवस्वराज्य सर्किट’ विकसित करण्यात यावे, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय पर्यटनमंत्री जी. किशन रेड्डी यांच्याकडे केली आहे.
उदयनराजे यांनी जी. किशन रेड्डी यांची नवी दिल्लीत नुकतीच भेट घेऊन त्यांना यासंदर्भात पत्र दिले. छत्रपती शिवरायांचा ओजस्वी इतिहास भारतीयांबरोबरच जगभरातील पर्यटकांनी प्रत्यक्ष भेट देऊन समजून घ्यावा. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, थोरले शाहू महाराज या सर्वांचेच शौर्य, पराक्रम आणि देदीप्यमान इतिहासाचा प्रसार व्हावा. त्यायोगे रोजगारनिर्मिती होऊन आर्थिक उन्नती व्हावी. त्यासाठी मराठ्यांच्या इतिहासाच्या पाऊलखुणा असलेली सर्व ठिकाणे जागतिक पर्यटनाच्या नकाशावर यावीत, अशी संकल्पना उदयनराजेंनी मांडली.
या योजनेच्या सुरुवातीला स्वराज्याच्या राजधान्या असलेल्या सर्व ठिकाणांचे सर्किट तयार करावे. दुसर्या टप्प्यात, स्वराज्यातील प्रमुख घटना घडलेल्या महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राबाहेरील सर्व ठिकाणांचा समावेश करावा. उत्तरेतील पानिपत, आग्रा येथपासून ते दक्षिणेतील तंजावरपर्यंतच्या सर्व ठिकाणांचा अभ्यास करून, त्यांचे सर्किट तयार करण्यात यावे. त्यामुळे जगभरातील पर्यटक या ठिकाणांना भेटी देतील, असे उदयनराजे यांनी पर्यटन मंत्र्यांना सांगितले.
सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर, पाचगणी व कास पठारासह अनेक पर्यटनस्थळे आहेत. त्यांचा प्रचार आणि प्रसिद्धी केंद्र शासनाच्या माध्यमातून सर्वत्र व्हावी. तसे झाल्यास जास्तीत जास्त पर्यटक जिल्ह्यात येऊन, स्थानिकांना रोजगार मिळेल. सातारा जिल्ह्यात ‘नॅशनल टूरिझम कॉन्क्लेव्ह’ आयोजित करून, स्थानिक पर्यटनाला चालना देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी उदयनराजेंनी केली. या मागण्यांना जी. किशन रेड्डी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. त्या भागातील पर्यटनवाढीसाठी तुम्ही जे प्रयत्न कराल, त्यास केंद्र शासनाचे कायम सहकार्य राहील, असे आश्वासन रेड्डी यांनी दिले.