ढेबेवाडी – यंदाचे वर्ष महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रातून बाहेर गेलेले उद्योग परत आणण्यासाठी हे गद्दार सरकार मुळासकट गाडले पाहिजे. त्यामुळे परिवर्तन घडवण्यासाठी सज्ज राहा, असे आवाहन शिवसेना युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.
शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा महामेळावा तळमावले, ता. पाटण येथे बुधवारी झाला. त्यावेळी ते बोलत होते. शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे-पाटील, जिल्हाप्रमुख हर्षद कदम, पाटण तालुकाप्रमुख सचिन आचरे, जिल्हा उपप्रमुख सचिन मोहिते, पंचायत समितीचे माजी सदस्य सुरेश पाटील, महिला आघाडी तालुकप्रमुख अनिता जाधव, उपजिल्हाप्रमुख नितीन काशीद उपस्थित होते.
आदित्य ठाकरे म्हणाले, खोक्याचे राजकारण करून, महाविकास आघाडीचे सरकार पाडणार्या 40 गद्दारांना गाडण्यासाठी जनतेने सज्ज रहावे. या खोके सरकारने महाराष्ट्रात एक तरी उद्योग आणला का? राज्यात असलेले उद्योग गुजरातला नेण्यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न केले. केंद्र सरकारने महाराष्ट्रावर नेहमीच अन्याय केला आहे.
महाराष्ट्राचे सर्व क्षेत्रात योगदान असतानादेखील हे राज्य जणू देशातच नाही, अशी वागणूक केंद्राकडून दिली जात आहे. महाराष्ट्रावर एवढा राग का, हा प्रश्न जनतेने या खोके सरकारला विचारायला हवा. आंदोलने करणार्यांवर लाठीमार करतात. हिम्मत नसलेले हे सरकार आश्वासनांपलीकडे काहीच करू शकत नाही. आमचा मतदारसंघ तालुका वा जिल्ह्यापुरता मर्यादित नसून, तो संपूर्ण महाराष्ट्रात आहे. हे गद्दार आमच्यावर खोटे आरोप करत आहेत. असले गद्दार आमदार आपल्याला चालणार का, याचा विचार जनतेने करावा. श्रीकांत माने यांनी सूत्रसंचालन केले. हर्षद कदम यांनी स्वागत व प्रस्ताविक केले. सचिन आचरे यांनी आभार केले.
विधानसभा अध्यक्षांकडून दुसरी अपेक्षा कोणती?
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार? सर्व काही सेटिंग झाले आहे. ईडीच्या कारवाईपासून आणि तुरुंगात जाण्यापासून वाचण्यासाठी गद्दारांच्या टोळीप्रमुखाने हे सर्व केले आहे. महाराष्ट्राची जनता सर्व काही बघत आहे, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली.