नगर -नगर महाविद्यालयात शिक्षणासाठी आलेले मनिपूर, मिझोरम, आसाम व नागालॅंड येथील विद्यार्थी लॉकडाऊनमुळे अडकून पडले होते. त्यांच्या घरवापसीसाठी शिवसेनेने पुढाकार घेवून ऑनलाईन अर्ज भरून त्यांचा घरी जाण्याचा मार्ग मोकळा केला. नगरसेवक बाळासाहेब बोराटे यांनी पुढाकार घेऊन अहमदनगर महाविद्यालयाच्या वसतीगृहातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी व परवानगीचे ऑनलाईन अर्ज देखील भरुन घेण्यात आले.
अहमदनगर महाविद्यालयात मनिपूर, मिझोरम, आसाम व नागालॅंड येथील 150 विद्यार्थी- विद्यार्थिंनी शिक्षण घेत आहे. ते वसतीगृहात वास्तव्यास असून लॉकडाऊनमुळे त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वसतीगृहात अडकून पडलेले हे विद्यार्थी घरी जाण्याच्या तयारीत असून, प्रशासकीय पातळीवर मंजूरी घेण्यासाठी त्यांच्या पुढे मोठी अडचण होती. ही अडचण दूर करुन शिवसेनेने या परराज्यातील विद्यार्थ्यांना मदत करीत त्यांना घरवापसीचा मार्ग मोकळा केला आहे. यावेळी सर्व विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करुन, त्यांचे नियमाप्रमाणे अर्ज भरुन घेण्यात आले. यावेळी नगरसेवक बाळासाहेब बोराटे, विशाल वालकर, प्राचार्य डॉ. आर.जे. बार्नबस, प्रा.सय्यद रज्जाक, अरुण बळीद, प्रभाग अधिकारी लांडगे, तारीक कुरेशी, निलेश धुळेकर आदिंसह महापालिका आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.