रत्नागिरी : संस्कृत विषयाकडे हमखास गुण मिळवण्याचा विषय म्हणून पाहिले जाते परंतू त्यापलिकडे जाऊन संस्कृत भाषा जपली आणि मनामनात जागवली गेली तर आपल्याला आपली संस्कृती कळेल व आपल्यावर चांगले संस्कार होतील. त्यामुळे केवळ भाषांतर किंवा पाठांतरापूरता या भाषेचा विचार करून चालणार नाही तर या भाषेतील ज्ञान आणि संस्कार मनामनात बिंबवले गेले पाहिजेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.
रामटेक येथील कवीकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी येथील उपकेंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.
आपले वेद वाङ्मय संस्कृतमध्ये आहे. ते समजून घेण्यासाठी या भाषेवर प्रभुत्व नाही मिळवता आले तरी किमान या भाषेचे ज्ञान आपल्याला असायला हवे.
संस्कृत ही अनेक भाषांची जननी आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोकणातील रत्नागिरीमध्ये या भाषेच्या जपणुकीसाठी एक महत्वाचे पाऊल कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या उपकेंद्राच्या माध्यमातून पडत असल्याबद्दल समाधान वाटते आहे. यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांचेही मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.
आपण माणूस म्हणून इतरांपेक्षा कसे वेगळे आहोत हे संस्कृत आपल्याला सांगते असेही ते म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी औरंगाबाद जिल्ह्यात पैठण येथे स्थापन करण्यात आलेल्या संतपीठाचा तसेच चंद्रपूर येथे कार्यरत असलेल्या वन अकादमीचे वन विद्यापीठात रुपांतर करण्याच्या शासनाच्या प्रयत्नांचा येथे आवर्जुन उल्लेख केला. त्यांनी संस्कृत विद्यापीठ व उपकेंद्राच्या भविष्यातील कामासाठी शासन त्यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही देत संस्कृत आणि संस्कृती जपण्यासाठी सर्व मिळून पुढाकार घेऊया असे आवाहनही केले.